Shivsena : तो एक प्रश्न अन् पत्रकार परिषदेत मोठा राडा, उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित ती विचारणा केल्यावर अरविंद सावंत संतापले का?
Uddhav Thackeray Shivsena Split: उद्धव ठाकरे यांच्या चार खासदारांनी नवी दिल्लीत नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये कोणते खासदार फुटणार याविषयी स्पष्ट भाष्य करण्यात आले नाही. उद्या दिल्लीत पक्षाची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यासाठी व्हीपी बजावण्यात आला आहे. पण पत्रकार परिषद त्या प्रश्नावर मोठा राडा झाला.

Aravind Sawant angry in Delhi Press Conference: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या चार खासदारांनी नवी दिल्लीत नुकतीच पत्रकार परिषद घेतली. पक्षातील किती आणि कोणकोणते खासदार शिंदे सेनेच्या गळाला लागले यावर भाष्य टाळण्यात आले. पण पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट संकेत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मिळाले. खासदार संजय राऊत यांनी अशा खासदारांसाठी एक शिवी हासडली. तर त्याचवेळी एका प्रश्नावर खासदार अरविंद सावंत कमालीचे संतापले. त्यांनी उठून थेट प्रश्नकर्त्यावरच आरोपांची राळ उठवली. त्यामुळे पत्रकार परिषदेत वातावरण तापले आणि पत्रकार परिषद आटोपती घेण्यात आली.
आणि तो प्रश्न विचारताच संतापले अरविंद सावंत
जे खासदार पक्ष सोडून जात आहेत. ते उद्धव ठाकरे हे त्यांना वेळ देत नाहीत असा आरोप करत असल्याचा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. हा प्रश्न समोर येताच अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी ही माहिती तुम्हाला कुणी दिली अशी विचारणा करताना दिसले. तर खासदार अरविंद सावंत हे प्रश्नकर्त्यावरच भडकले. त्यांनी तुम्ही सुपारी घेऊन आलात का? असा उलट सवाल केला. तसेच ज्याने हा दावा केला आहे, त्या खासदाराचे नाव सांगा असा आग्रह धरला. त्यानंतर या मुद्दावरून एकच गदारोळ उडाला. अरविंद सावंत यांनी हा अपप्रचार सुरू असल्याचा दावा केला. त्यानंतर पत्रकार परिषद आटोपती घेण्यात आली.
आता कायदेशीर मार्गाने जाणार
तर या प्रकरणी शिवसेना नेते अनिल देसाई यांनी मुद्देशीर बाजू मांडली. आम्ही विश्वासावर चालतो. आमच्या घरी मुलीचं लग्न आहे. पाहुणे आले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ते बोलले. त्यापलीकडे आम्हाला माहीत नाही, असे ते म्हणाले. त्यांनी तीन दिवसांपूर्वीच्या बैठकीतील घडामोड माध्यमांसमोर मांडली.
खासदारांशी चर्चा झाली. तेव्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत असं त्यांनी सांगितलं. खासदारांना कोण चालवंतय, ओम बिर्ला यांच्याकडे ग्रुप स्थापना करण्यासाठी येणार आहे, त्याला मान्यता देऊ नये म्हणून आम्ही पत्र दिलं आहे. उद्या आम्ही पक्षाची बैठक बोलावली आहे. त्यांच्यावर भरोसा नाही असं नाही. विश्वास आहे. आम्ही पक्ष सोडतोय असं त्यांनी म्हटलं नाही. त्यामुळे ते आमच्यासोबतच आहे, हा विश्वास आहे. मीडियात ज्या चर्चा सुरू आहे, त्यावरून असं होऊ शकतं असं वाटतंय. त्यामुळेच आम्ही लिगल स्टेप घेत आहोत. खबरदारी म्हणून कॅव्हेट सारखं आम्ही पाऊल उचलत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्या उद्धव सेनेच्या खासदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यासाठी व्हिप बजावण्यात आला आहे. याबैठकीला ऑनलाईन नाही तर प्रत्यक्ष खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोण कोणते खासदार फुटले याचा सस्पेन्स संपणार आहे.
