अख्ख्या महाराष्ट्रावर शोककळा… सातारा-ऐरोलीतील दोन जवानांना काश्मीरमध्ये वीरमरण

Maharashtra Soldiers Martyred : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये आज एक भीषण स्फोटाची घटना घडली. एलओसीजवळ झालेल्या या स्फोटात महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले आहेत.

अख्ख्या महाराष्ट्रावर शोककळा... सातारा-ऐरोलीतील दोन जवानांना काश्मीरमध्ये वीरमरण
satara and airoli martyred in kashmir
Image Credit source: Google
| Updated on: Jun 10, 2026 | 5:01 PM

जम्मू-काश्मीरमधून दु:खद बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये आज एक भीषण स्फोटाची घटना घडली. एलओसीजवळ झालेल्या या स्फोटात दोन जवान शहीद झाले आहेत. उरी सेक्टरमधील कमलकोट परिसरात हा स्फोट झाला. यात महाराष्ट्रातील अर्जुन जाधव आणि विक्रम बाळकृष्ण या दोन जवानांना वीरमरण आहे. या घटनेत गंभीर जखमी झाल्यानंतर या दोघांना श्रीनगरमधील बादामीबाग छावणीतील लष्कराच्या बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.

अर्जुन जाधव हे साताऱ्यातील कराडच्या शहापूरमधील रहिवासी आहेत. तर विक्रम बाळकृष्ण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी आहेत. अर्जुन जाधव यांच्या मागे पत्नी एक मुलगा आई वडील भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर त्यांच्या शहापूर या गावी शुक्रवारी अंतिम संस्कार होणार आहेत. अर्जुन हे 25 जून रोजी त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ते 15 जूनला सुट्टीवर येणार होते. मात्र त्या अगोदरच त्यांना वीरमरण आल्याने कुटुंबासह संपूर्ण शहापूर गावावर शोककळा पसरली आहे.

सीमावर्ती भागातील सुरक्षा

जम्मू-काश्मीरमध्ये बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यांतून सुमारे 740 किलोमीटर लांबीची नियंत्रण रेषा (एलओसी) जाते. तर जम्मू विभागात एलओसी ही पुंछ, राजौरी आणि अंशतः जम्मू जिल्ह्यातून जाते. तसेच सुमारे 240 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा सांबा, जम्मू आणि कठुआ जिल्ह्यांतून जाते. या एलओसीची सुरक्षा भारतीय लष्कर करते, तर आंतरराष्ट्रीय सीमेची जबाबदारी सीमा सुरक्षा दल (BSF) कडे आहे. सीमापार घुसखोरी, तस्करी आणि ड्रोनद्वारे होणाऱ्या हालचालींना आळा घालण्यासाठी दोन्ही सुरक्षा दल सतत तैनात असतात.

ड्रोनद्वारे घुसखोरीचे वाढते आव्हान

ड्रोनच्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अत्याधुनिक अँटी-ड्रोन प्रणाली तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी नेटवर्क आणि त्यांचे समर्थक ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे, दारुगोळा, रोख रक्कम आणि अमली पदार्थ भारतीय हद्दीत पाठवण्याचा प्रयत्न करतात. या वस्तू दहशतवादी संघटनांशी संबंधित ओव्हर ग्राउंड वर्कर्स गोळा करतात आणि नंतर जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवल्या जातात.

Follow Us