Maharashtra News LIVE : आखाती देशातील युद्धामुळे शेतकरी संकटात, कांद्याची निर्यात ठप्प
Maharashtra News LIVE Updates : भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. आज भोंदूला कोर्टात हजर केले जाणार आहे. राज्यात सध्या अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
घडीची टिकटीक बंद करणारा महाराष्ट्रात कोण पैदा झाला नाहीये – प्रताप पाटील चिखलीकर
काम पडलं कि दादांचे जोडे उचलायचे आणि दादांच्या जाण्यानंतर आठ दिवसातच घड्याळाची टिक टिक आता बंद पडणार असे भान न ठेवता वक्तव्य करायचे हे कोणालाही आवडले नाही असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात चिखलीकर यांनी हे वक्तव्य केले. नांदेड शहरातील जुना मोंढा टॉवरवरील घड्याळ बंद असल्याबाबत पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना घड्याळ चालू आहे का जिल्ह्यात असे खोचक अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यावरून चिखलीकर यांनी भर सभेतून अशोक चव्हानाच्या त्या विधानाचा समाचार घेतलाय. घड्याळ्याची टिक टिक बंद करणारा नांदेडच सोडा महाराष्ट्रात कोणी पैदा झाला नाही असेही चिखलीकर म्हणाले.
-
भोंदू बाबा अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
-
-
भोंदू अशोक खरातला महाराष्ट्र पोलीस अकादमी मधून काढले बाहेर
भोंदू अशोक खरातला घेऊन पोलीस नाशिक कोर्टाच्या दिशेने रवाना झाले आहेत.पोलीस बंदोबस्तात कोर्टात हजर केले जात आहे. आज भोंदू अशोक खराची कस्टडी संपत असल्याने कोर्टासमोर हजर करणार.
-
वसई विरार महापालिका सभागृहात पक्षाचे चिन्ह लावून येणाऱ्या भाजपा नगरसेवकांना महापौरांची तंबी
वसई विरार सभागृहात भाजपाचे कमळ चिन्ह लावून येणाऱ्या भाजप नगरसेवकांना महापौर अजीव पाटील यांनी तंबी दिली आहे. सभागृहाच्या नियमानुसार कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाने आपल्या पक्षाचे चिन्ह लावून येऊ नये असा नियम आहे. यापुढे कुणीही आपल्या पक्षाचे छातीचे बिल्ले लावून आल्यास सभागृहात प्रवेश मिळणार नाही, असे भाजपा नगरसेवकाना महापौरांनी खडसावले. वसई-विरार महापालिकेत पहिल्यांदाच भाजपाचे ४४ सदस्य निवडून आले आहेत. प्रत्येक वेळी ते पालिकेत येताना भाजपाचे कमळ चिन्ह असलेले बिल्ले लावून येतात.
-
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई
पुणे वाहतूक पोलिसांकडून नियमभंगावर कारवाई करण्यात आली आहे. तीन दिवसांत 51.54 लाख रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला, तर 852 वाहनांवर पुणे पोलिसांकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक पोलिसांनी २७ ते २९ मार्च या कालावधीत वाहतूक नियमभंगाविरोधात विशेष मोहीम राबवली. तीन दिवसांच्या कारवाईत ट्रिपल सीट प्रवास, मद्यपान करून वाहन चालवणे आणि मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये पुणे पोलिसांनी ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या तब्बल १२६५ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली असून ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणारे आणि बेकायदेशीररित्या मॉडिफाईड सायलेन्सर बसवलेल्या ३२० वाहनांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २३४ सायलेन्सर जप्त केले आहेत..
-
-
नाशिक- सरकारी वकील अजय मिसर भोंदू अशोक खरात केस लढवण्यास नकार
नाशिक – सरकारी वकील अजय मिसर यांनी भोंदू अशोक खरातची केस काढण्यास असमर्थता दाखवली आहे. SIT ने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. मात्र मात्र सरकारी वकील ॲड अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिला आहे. अजय मिसर यांनी नकार दिल्याने सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच युक्तिवाद करणार .
-
सिद्धिविनायक मंदीरातील विश्वस्तांकडून कार्यकारी अधिकारी आणि उप कार्यकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप
सिद्धिविनायक मंदीरातील विश्वस्तांकडून कार्यकारी अधिकारी आणि उप कार्यकारी अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. काही विश्वस्तांनी विधी व न्याय विभागाकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. विधी व न्याय विभागाकडून या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. कार्यकारी अधिकारी विणा पाटील आणि उप कार्यकारी अधिकारी संदीप राठोड यांना ७ दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
मुक्ताईनगर जळगाव – निर्यात थांबल्याने आणि वाढत्या उष्णतेने टरबूज उत्पादकांना फटका
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक टरबुजाची लागवड शेतकऱ्यांनी केली, मात्र दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. तसेच निर्यातही थांबल्याने टरबूज मागणी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात टरबूज खराब होत आहे. शेतकरी पूर्णतः चिंतेत सापडला असून सर्वत्र शेतात टरबुजाचा सडा पडला आहे. कृषी विभागाने याबाबत लक्ष देत मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
-
आखाती युद्धाचा परिणाम, निर्यात ठप्प झाल्याने कलिंगडाचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता शेतकऱ्यांवर दिसून येत आहेत. गोंदिया जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड करण्यात आली होती. मात्र निर्यात ठप्प झाल्यामुळे बाजारात कलिंगडाला अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये दर घसरल्याने शेतकरी चिंतेत असून काही ठिकाणी वाहतूक खर्चही निघणे कठीण झालंय.
-
धुळेकरांकडे महापालिकेचे तब्बल ९६ कोटी थकले, मार्च अखेरपर्यंत किती वसुली? आकडेवारी जाहीर
धुळे महानगरपालिकेने ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत एकूण ४८ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. वर्षभरात सुमारे ४० हजार जागरूक नागरिकांनी आपल्या कराचा भरणा केला. विशेष म्हणजे, महापालिकेने वर्षभरात चार वेळा शास्ती माफी (दंड माफी) देऊनही अद्याप मालमत्ताधारकांकडे ९६ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी वसुलीची स्थिती देखील चिंताजनक असून, लाखो रुपयांची थकबाकी असताना केवळ ५ कोटी रुपयेच पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मोठ्या प्रमाणात थकबाकी शिल्लक असल्याने नवीन आर्थिक वर्षात महापालिका प्रशासन आता कोणती कठोर पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
जालन्यात उन्हाचा कडाका, पण जंगलातल्या प्राण्यांसाठी वनविभागाचा मोठा निर्णय
जालना जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने नैसर्गिक जलस्रोत आटू लागले असून, वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर भोकरदन तालुक्यातील धावडा, मेहेगाव आणि परिसरातील जंगलांमध्ये वनविभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनविभागातर्फे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या उपाययोजनेमुळे पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या शेकडो वन्य प्राण्यांना मोठा दिलासा मिळाला असून, वनविभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
पुणे-अहिल्यानगर हायवेवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, एक जण ठार
पुणे–अहिल्यानगर महामार्गावर शिक्रापूर येथे एका भीषण अपघातात एकाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने समोरून येणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तातडीने धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
-
पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाभाड्यावरून रिक्षाचालक आणि प्रवासी भिडले
पिंपरी-चिंचवडमधील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या डांगे चौकात रिक्षाभाड्याच्या कारणावरून रिक्षाचालक आणि प्रवाशात जोरदार राडा झाला. किरकोळ शब्दांवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले, ज्यामुळे भरचौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या फ्री-स्टाईल हाणामारीमुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
-
पिंपरी चिंचवडमध्ये भररस्त्यात कारने घेतला पेट, नागरिकांची उडाली तारांबळ
पिंपरी चिंचवडमधील काळभोर नगर भागात एका धावत्या चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही कार काळभोर नगर येथील अंडरपासजवळ आली असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने समयसूचकता दाखवत तत्काळ गाडी थांबवून खाली उडी घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. गाडीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले, मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ओव्हर हिटिंगमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
-
आखाती देशातील युद्धामुळे शेतकरी पुन्हा संकटात, चाकण बाजार समितीत कांद्याचा ढीग
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण बाजार समितीत कांद्याचे मोठे साठे साचले आहेत. साठवणुकीसाठी जागा अपुरी पडत असल्याने शेतकऱ्यांनी आपला माल उघड्यावर ठेवला होता, मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने या कांद्याचे अतोनात नुकसान केले आहे. एकाबाजूला घसरलेले बाजारभाव आणि दुसरीकडे निसर्गाचा फटका अशा दुहेरी संकटात चाकणचा बळीराजा अडकला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
-
खासगी स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलींचा विनयभंग
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघड. सरकारवाडा पोलीस ठाण्यात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. संशयित चालक सुरेश नामदेव पाटील याला अटक. व्हॅनमध्ये बसवताना-उतरवताना मुलींना अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप. भीतीपोटी मुली व्हॅनमध्ये जायला नकार दिल्यानंतर हा प्रकार आला उघडकीस. 8-9 मुलींशी गैरवर्तन केल्याची माहिती तपासात समोर. पालकांमध्ये तीव्र संताप, शालेय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
-
भोंदू अशोक खरात केवळ काही लाखांचं उत्पन्न दाखवून भरत होता आयकर
तर अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात. आयकर विभागाला अशोक खरातने कंपन्या, बांधकाम प्रकल्प हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा देखील संशय. आयकर विभागाकडून अशोक खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता..
-
नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी
संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा येत्या शनिवार आणि रविवार राहणार बंद. स्मार्ट सिटीकडून जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार असल्यानं पाणीपुरवठा राहणार बंद. शहरातील सहाही विभागात पाणी गळती रोखण्यासह जलकुंभांवर केली जाणार दुरुस्तीची कामं तर सोमवारी सकाळीही कमी दाबाने होणार पाणीपुरवठा. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन
-
स्वीकृत नगरसेवक पदासाठी सगळ्या पक्षात रस्सीखेच
स्वीकृत नगरसेवक पदासाठी नेत्यांची मुले बहीण भाऊ स्पर्धेत. माजी खासदार डॉ. भागवत कराड यांची बहीण – डॉ. उज्ज्वला कराड डॉ. भागवत कराड यांचा मुलगा – हर्षवर्धन कराड. भाजप आमदार संजय केणेकर यांचा मुलगा – हर्षवर्धन संजय केणेकर. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे बंधू – राजेंद्र दानवे.
-
सोलापूर शहरात राहत्या घराच्या आवारातच गांजाची लागवड केल्याचे उघड
रजाक गफुर शेख असे या गांजाची लागवड करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आलीय. पोलिसांनी आरोपीकडून 21 किलो 439 ग्रॅम गांजा जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत 4 लाख 39 हजार रुपये इतकी आहे. दरम्यान घराच्या आवारातच गांजाची लागवड करण्याची शहरातील ही पहिलीच घटना मानली जात आहे.
-
कल्याण पूर्वेत चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत तीन दुकानांवर डल्ला
अजय पूजा भंडार, आयुर्वेदिक स्टोअर आणि लक्ष्मी कलेक्शन टार्गेट. शटर उचकटून चोरी; संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, कोळसेवाडी पोलिसांचा तपास सुरू. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. हेच नाही तर अशोक घरात याचे अनेक नेत्यांसोबत जवळचे संबंध असल्याचे उघड झाले. भोंदू बाबा अशोक खरातला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस कोठडी संपत असल्याने अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. SIT न्यायालयात काय सांगणार याकडे राज्याचे लक्ष आहे. रात्री उशिरा भोंदू बाबाच्या मुलाला अटक करण्यात आली. पण पत्नी फरार झाली. राज्यात सध्या अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्टसह येलो अलर्ट जारी करण्यात आला. इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्याचे संकेत आहेत. या युद्धामुळे एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.