काँग्रेस फोडा, रिकामी करा; चंद्रशेखर बावनकुळेंचे पक्ष कार्यकर्त्यांना आदेश

काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे. माझं काय होईल याची काळजी अजिबात करू नका, देवेंद्रजी आहेत, मी आहे, आम्ही न्याय देणार असे सांगत काँग्रेस फोडा, रिकामी करा असे आदेश बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना दिले.

काँग्रेस फोडा, रिकामी करा; चंद्रशेखर बावनकुळेंचे पक्ष कार्यकर्त्यांना आदेश
चंद्रशेखर बावनकुळे
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 05, 2025 | 11:03 AM

राज्यातील निवडणुका पार पडल्या असल्या तरी राजकीय पक्षांमधील फोडाफोडीचे राजकारण अद्यापही सुरूच असून अनेकांचे विविध पक्षांमध्ये आऊटगोईंग – इनकमिंग सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना एक महत्वाचा कानमंत्र दिला आहे. तुम्ही काँग्रेस (Congress) पार्टी खाली करून टाका. काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा  फायदा आहे. माझं काय होईल याची काळजी अजिबात करू नका, देवेंद्रजी आहेत, मी आहे, मुरलीधर मोहोळ आहेत, अमित शाह आहेत. आम्ही तुम्हाला न्याय देणार की त्यांना देणार असे सांगत काँग्रेस फोडा, रिकामी करा असे आदेश बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना दिले. आहेत. पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. भाजप जेव्हा तिकीट देतो तेव्हा आधी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करतो, नंतर इतरांचा.. काँग्रेसची लोकं आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार, असे आश्वासनही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

मात्र बावनकुळे यांचे हे वक्तव्य काँग्रेस नेत्यांना चांगलंच झोंबलं असून त्यावर वर्षा गायकवाड यांनी टीका केली आहे. काँग्रेस संपवण्याची गोष्ट त्यांनी करू नये, हा लोकांचा पक्ष आहे, लोक विचारधारेने जमला आहे. लोकांची काँग्रेसप्रती श्रद्धा, निष्ठा आहे आणि आम्ही विचारधारेशी प्रामाणिक आहोत. असे बोलणारे खूप आले, आधी स्वत:चा पक्ष सांभाळा असे म्हणत गायकवाड यांनी बावनकुळेंवर हल्ला चढवला.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?

आपला पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्वच पक्ष पक्षप्रवेश करून घेत असतात. विरोधकांमध्ये स्वतःची पार्टी वाढवण्याची क्षमता आता राहिली नाही , काँग्रेस पार्टीमध्ये काही शिल्लक राहिले नाही, शरद पवार साहेबांकडे कोणी जायला तयार नाही,उद्धव ठाकरेंचं शिवबंधन तर सगळे विसरून गेले आहेत त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही, तर आम्ही काय करावं ? शिवसेना ठाकरे गटाचे लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि आम्हाला सांगतात की उद्धव ठाकरेंनी वख बोर्डाच्या विधेयकाला विरोध केला म्हणून आम्ही तुमच्या पक्षात येत आहोत आता आम्ही काय करायला हवं ? असा सवालही त्यांनी विचारला.

पुणे जिल्ह्याला मजबूत जिल्हा म्हणून पुढे नेणार

पुढच्या काळात पक्षाचं संघटन अधिक मजबूत करून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवा अशा सूचना दिल्या आहेत. पुणे जिल्ह्याला मजबूत जिल्हा म्हणून पुढे घेऊन जाणार. येणाऱ्या एक महिन्यांमध्ये महामंडळांमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त करणार. राज्य सरकारचे महामंडळ लवकरच जाहीर होतील. आम्हाला आता कानमंत्र देण्याची गरज नाही, पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात आमच महायुतीचं सरकार असेल, असे बावनकुळे म्हणाले.

संजय राऊतांना लोकं सिरीयसली घेत नाहीत

संजय राऊत म्हणजे दिवसा न दिसणारा एक असा जाऊ द्या आता. संजय राऊत काहीही बोलतात काहीही लिहितात, महाराष्ट्राने आता संजय राऊतांना ऐकणं बंद केल आहे. त्यांना तुम्ही सिरीयस घेत नाही. लोक ऐकतात आणि सोडून देतात संजय राऊत यांच्या बद्दल महाराष्ट्र आता सिरीयस नाही अशी टीका त्यांनी केली. पुस्तक त्यांनी लिहिलं, त्यांनी छापलं आणि तेच वाचतील असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

काँग्रेस मधून भाजपमध्ये इन्कामिंग सुरू

काँग्रेसला लोकं सोडून चालले आहेत. थोपटे यांनी काँग्रेसला सगळं दिलं तरीसुद्धा त्यांना पक्ष सोडावा लागला. त्यांना त्यांच्या पक्षाकडून , राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाहीत. काँग्रेसला कुठलंही धोरण नाही, जो जो काँग्रेस किंवा इतर पार्टी मधून आमच्याकडे येईल त्याचे स्वागत आहे. तुम्ही थकून जाल इतके जणं आमच्याकडे येत आहेत असे बावनकुळे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us