
गेल्या २४ तासात राज्याच्या विविध भागात अपघातांच्या अत्यंत भीषण घटना समोर आल्या आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या एका हृदयद्रावक अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर यवतमाळ आणि लातूरमध्येही रस्ते अपघातांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यासोबत दुसरीकडे, नांदेडमधील दुचाकी स्फोट प्रकरणाचा तपास आता एटीएस (ATS) कडे सोपवण्यात आला असून यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील मंचरजवळील एकलहरे येथे रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. एका भरधाव लक्झरी बसने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील आई, वडील आणि आजी अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन लहान मुले या अपघातात गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर मंचर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. एकलहरे परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
यवतमाळ-घाटंजी मार्गावर आकपुरी ते मुरली गावाजवळ ऑटो आणि मॅक्झिमो गाडीची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे लातूरच्या मुरूड येथे बस स्थानकासमोर एका पिकअप टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो थेट लोकांच्या घोळक्यात शिरला. या अपघातात चार जण जखमी झाले असून, रस्त्याकडेला उभ्या असलेल्या अनेक मोटारसायकलींचेही मोठे नुकसान झाले आहे.
त्यासोबतच नांदेड शहराच्या वाजेगाव बंधारा परिसरात शनिवारी एका दुचाकीला अचानक आग लागून चालकाचा होरपळून मृत्यू झाला होता. मात्र, प्राथमिक तपासात ही घटना केवळ अपघात नसून घातपाताचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी घटनास्थळी काही संशयास्पद वस्तू आढळल्या होत्या. तसेच दुचाकीतून छोटे-छोटे स्फोट झाल्याने एटीएस (ATS) आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली आहेत. मृत तरुण परभणीचा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी पोलिसांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
अमरावतीच्या वेलकम पॉइंट परिसरात खाजगी ट्रॅव्हल्सची बेशिस्त वाहतूक वाढली आहे. रस्त्याच्या मधोमध बसेस थांबवल्या जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी वाहतूक पोलीस वारंवार गायब असल्याचे दिसून येते. तसेच नवापूर तालुक्यातील खांडबारा ते काकरपाडा हा मुख्य रस्ता गेल्या १५ वर्षांपासून रखडला आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत असून, विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.