
Mayuri Chaudhari Death : चेन्नईमध्ये फिरायला गेलेल्या महाराष्ट्रातील 26 विद्यार्थ्यांच्या एका समूहासोबत अत्यंंत दुर्दैवी घटना घडली आहे. तामिळनाडूतील गोल्डन बिचवर फिरायला गेलेल्या या विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी पाण्यात अडकल्याचे समोर आले आहे. यात एका मयुरी चौधरी नावाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात जय पाटील नावाचा विद्यार्थीदेखील गायब आहे. तर राज केदारी या तिसऱ्या विद्यार्थ्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. ही दुर्घटना समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळाडूच्या सरकारशी संपर्क साधला आहे. तसेच गायब झालेल्या विद्यार्थ्याचा शोध घ्यावे, असे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जय पाटीलचे पालक चेन्नईत पोहोचले आहेत. तर मयुरी चौधरीचे कुटुंबीय नागपूरहून चेन्नईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मयुरी चौधरी ही मुळची भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी आहे. ही घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मयुरीच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनला गती द्यावी, अशी विनंती तामिळनाडू सरकारकडे केल आहे. तसेच आम्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मयुरीने 15 दिवसांपूर्वीच नोकरीला सुरुवात केली होती. शनिवारी सुटी असल्याने ती आपल्या सहकाऱ्यांसोबत फिरायला गेली होती. परंतु पाण्यात गेल्यानंतर एकूण तीन जण अडकले. यात मयुरीचा मृत्यू झाला. या घटनेबाबत तिच्या मैत्रिणीने सांगितले आहे.
दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयुरीचा मृतदेह लवकरात लवकर आमच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. शवविच्छेदन केल्यनंतर मयुरीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपवला जाईल. तर जय पाटीलचा रेस्क्यू टीमकडून शोध घेतला जात आहे. ही घटना समोर येताच आता फिरायला गेल्यानंतर योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. सोबतच फिरायला गेल्यानंतर तरुणाईने योग्य ते भान राखूनच आनंद घ्यायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.