सातारा-सांगलीत भाजपला सर्वात मोठा धक्का, उमेदवार विजयी, पण… मोठा गेम काय झाला? धक्कादायक माहिती समोर
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी झाला असला तरी, महाविकास आघाडीला महायुतीची 100 मते मिळाली आहेत. यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला असून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. पराभूत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी मंत्र्यांनी दबाव टाकल्याचा आरोप करत, हा लोकशाही वाचवण्यासाठीचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीत महायुतीतील वाद आधीपासूनच विकोपाला गेले होते. हे वाद किती प्रचंड विकोपाला गेले होते हे अखेर निकालाने स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी झाला आहे. मात्र, महायुतीचे 100 मते फुटली आहेत. ही सर्वच्या सर्व मते महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 100 मते फुटल्याने महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. एककीडे विरोधकांचे मतदार आणि खासदार फोडले जात असतानाच महाविकास आघाडीने काहीच हातात नसताना महायुतीचे 100 मतं फोडल्याने महायुतीसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
सातारा-सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली आहे. कदम विजयी झाले आहेत. पण महाविकास आघाडीला महायुतीची 100 मते मिळाली आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शेवटपर्यंत वाद होता. टोकाचे वाद होते. नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही झाला. वरिष्ठ नेत्यांकडून सर्व नेत्यांना वाद मिटवण्याच्या आणि जुळवून घेण्याच्या सक्त सूचनाही देण्यात आल्या होत्या. शेवटच्या क्षणीही हा वाद होता. हा वाद संपल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात निकालातून महायुतीत वाद होता हे अधोरेखित झालं आहे.
मंत्रिपद शाबूत ठेवण्यासाठी…
दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी ही लढाई सुरूच राहील. आमदारकीसाठी माझी निवडणूक नव्हती. लोकशाही वाचवण्यासाठी माझी लढाई सुरू होती, अशी भावना सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केली आहे.
मला 100 मतं अधिक पडली आहेत. त्यामुळे महायुतीकडून महाविकास आघाडीकडे येण्यासाठी मतदार इच्छुक असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. सातारच्या दोन्ही मंत्र्यांनी मंत्रिपद शाबूत ठेवण्यासाठी मतदारांवर दबाव टाकला होता. आमचं मंत्रिपद वाचवायचं आहे. उमेदवार निवडून आला पाहिजे, असं अर्जव ते करत आहेत. त्यामुळेच आपला पराभव झाला, अशी टीकाही जगताप यांनी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि जयकुमार गोरे यांचं नाव न घेता केली आहे.