अजिंठा लेण्याच्या दगडात जसे चित्र कोरले तसे बावनकुळे, मनोज जरांगे यांची जोरदार टीका
धाराशिवच्या खेड गावात मनोज जरांगे पाटील यांचे आज जोरदार स्वागत झाले आहे. येथे मराठा बांधवाबरोबर आज त्यांनी बैठक घेतली आहे. जरांगे पाटील आज तुळजापूर येथे मुक्कामी असून उद्या तुळजाभवानीचे दर्शन घेऊन ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला निघणार आहेत.

महसुल मंत्री बावनकुळे मराठ्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करीत आहे, मराठा मंत्र्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. जाहीरपणे पत्रक काढून रद्द करतोय. माझं देवेंद्र फडणवीस आणि मराठ्यांच्या आमदारांना आव्हान आहे, तुम्ही एवढंच म्हणा बावनकुळे यांनी केलेली चूक आम्ही दुरुस्त करू आणि संजय शिरसाठ यांनी केलेली चूक आम्ही दुरुस्त करू असं शिवसेनेच्या मराठा आमदारांनी म्हणावे, मग मी गप्प का बसावे असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अजिंठा लेण्याच्या दगडात जसे चित्र कोरले तसे बावनकुळे दिसतोय अशा एकेरी शब्दात जरांगे यांनी बावनकुळे यांची खिल्ली उडवली आहे.
मराठ्यात गैरसमज गेला पाहिजे यासाठी खूप मीडिया ट्रायल घेतली आहे. मी जर आंदोलनात असलो तर नोंदी द्याव्या लागणार आहेत. मी जर आंदोलनात असलो तर कोल्हापूर आणि सातारा गॅझेट लागू करावा लागणार आहे. काही मराठ्यांचे समन्वयक आणि अभ्यासक हाताखाली धरायचे आणि माझ्या विरोधात आंदोलन करायचे अशा यांचा प्लान आहे. मी माझ्या संसारात बदल केला नाही,समाजाच्या संसारात बदल केलाय. नियती मराठ्यांच्या बाजूने आहे. एखाद्याला गूळ चारून मारणे हा प्रयोग फडणवीस यांच्याकडून सुरु आहे.स्लो पॉयझन सुरु आहे. बावनकुळे यांनी पत्र दिलं नोंदी रद्द करायला असाही आरोप जरांगे पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर केला आहे.
बावनकुळे यांचं पत्र बावनकुळे यांच्याच ऑफिसमधून माझ्या हातात लागल्याचा गौप्यस्फोट यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ज्यांनी केलं त्यांचाच नाव मी घेत असतो. मोघम आरोप करत नसतो. बावनकुळे कशामुळे रद्द करतोय. जागच्या जागी हे लोकं दाबायला शिका अन्यथा तुमच्या जमिनी हडपल्या शिवाय राहणार नाहीत. तुमचे मुदडे पडतील. बावनकुळे आणि मराठ्यांचा काहीच संबंध नसतांना मराठ्याचं वाटोळं करत आहे असाही आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की आपल्याच मतांवर निवडून आले आणि आपल्याच विरोधात मंत्री पदाचा गैरवापर आहेत. संजय शिरसाट यांच्यासाठी मराठ्यांच्या पोरांनी कामं केलं, मात्र त्यानेच गद्दारी केली आपल्याशी. मंत्री रद्द करा म्हणाले तर अधिकाऱ्याचे काहीच चालत नाही. आता 29 ऑगस्टच्या आंदोलनात काहीच माग ठेवायचं नाही, 5 मिनिटं सुद्धा वेळ द्यायचा नाही. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी घ्यायची आहे. आपल्याला मुंबईला जायची गरज नाही,त्यावेळी आपण गेलो तर फडणवीस नागपूर आणि शिंदे दरे गावाला निघून गेले. अजितदादा सुद्धा पुण्याला निघून गेले. आपल्याकडे मुंबईला जायची गरज नाही. याच्यानंतर आंदोलन होणार नाही. हे शेवटचं आणि निर्णायक आंदोलन होणार आहे असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
