Manoj Jarange Patil : अन्यथा तुम्हाला जड जाईल! जरांगे पाटील कलेक्टर आशिमा मित्तल यांच्यावर भडकले; दिला थेट इशारा!
Manoj Jarange Patil On Collector Ashima Mittal : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघून पाटण, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली येथे मुक्काम करत १९ सप्टेंबरला आझाद मैदानावर पोहोचून उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील यांनी अखेर पुन्हा एकदा मुंबईत दाखल होण्याची घोषणा केली आहे. उद्या मुंबईतील आझाद मैदानावर कसं पोहोचायचं, त्याचा मार्ग सांगणार म्हणत जरांगेंनी आज त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता जरांगे पाटील हे 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत, तर पाटण, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली याठिकाणांवर मुक्काम करत 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचत उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली.
त्यांनी सांगितलं की, “बावनकुळे कलेक्टरला अंतरवालीवर लक्ष ठेवायला सांगतात का? कलेक्टर तीन वेळा इथे आल्या. त्या महिला आहेत. त्यांची इज्जत करतो. त्यांना ताई म्हणून बोललो. जर मंत्री भुजबळ आणि बावनकुळेंमुळे मला कलेक्टरकडून त्रास झाला तर मीही कलेक्टरना फासा टाकेन, हा मराठ्यांचा फासा निघणार नाही. माझ्या नादी लागू नका, मी इज्जत करतो आहे. मराठ्यांसोबत सरकार राजकारण करत आहे, असा आरोप जरांगेंनी केला आहे.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा कलेक्टरांनी सातत्याने प्रयत्न केल्याचा आरोप जालन्याच्या कलेक्टर आशिमा मित्तल यांच्यावर केला आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळांनी जरांगे पाटील यांनी कलेक्टर आशिमा मित्तल यांच्याशी घाणेरड्या भाषेत चर्चा साधल्याचं नाशिकमध्ये बोलताना म्हटलं होतं. बावनकुळे हे कलेक्टरच्या माध्यमातून राजकारण करुन आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी प्रसाद लाड भाऊंचं ऐकून शांत बसलोय.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना सुनावलं आहे. ते म्हणाले की, मी तुम्हाला इज्जतीनेच बोललो. तुमची कदरच केली. तुम्ही बावनकुळेंच ऐकून विनाकारण गोरगरिब मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नामद्ये विष मिसळण्याचं काम करु नका. होय, तुम्ही या जिल्ह्याच्या मालक आहात. तुमच्यासाठी सगळे लेकरं सारखे आहेत. तुम्ही जातीवाद करण्याचा प्रयत्न करु नका, जड जाईल. मराठ्याच्या पुढे यंत्रणा टिकत नाही. तुमचा सन्मान केलेला आहे. या जिल्ह्यात तुमचा सन्मानच होईल, असंच वागा. तुम्ही महिला आहात. पण अधिकारी आणि नेत्यांमध्ये लिंगभेद नसतो. जनता त्यांना बोलतच असते. राजकारणात लिंगभेद नसतो.
महिलाही मंत्री झाल्या तरी त्यांना बोलणी खावी लागतात. तुम्हाला सहन होत नसेल तर मग त्या पदावरुन उतरा. तुम्ही कलेक्टर आहात. तुम्ही सक्षम अधिकारी आहात. तुमच्याकडे महिला आणि पुरुष दोघेही त्यांचे प्रश्न घेऊन येणार. तुम्ही म्हणाल मी महिला आहे. माझ्याकडे पुरुषांनी येऊ नये. हा लिंगभेज चांगला नाही. वर्णभेद-जातीय भेद करायचा नाही. पत्रकार परिषदा घेणं तुमचं काम नाही. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं का बाजू मांडायची. मराठ्यांना आम्ही सगळं दिलं हे सांगण तुमचं काम नाही. आमच्या मागण्या राज्यस्तरावरच्या आहेत. मुख्यमंत्र्यांना या राज्यात काही मान नाही राहिला का? तुम्ही का मध्येमध्ये करताय, सरकार आणि आम्ही बघून घेऊ, असं जरांगे पाटील म्हणाले.