नरसापूर प्रकरणात भिमराव कांबळेला फाशी, जरांगे पाटलांची निकालावर पहिली प्रतिक्रिया म्हणाले आता संतोष देशमुख प्रकरणातही…
नरसापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती, एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील आरोपीला अखेर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नरसापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती, एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील आरोपी असलेल्या भीमराव कांबळे याला आता न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. 26 जून रोजी या प्रकरणात न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवलं होतं, त्यानंतर त्याला आज मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान या निकालावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, मनोज जरांगे पाटील यांनी या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मुख्यमंत्री साहेबांचं कौतुक केले पाहिजे. तत्परता दाखवली आणि दोन महिन्यांत आरोपीला शिक्षा झाली. असाच नियम संतोष देशमुख प्रकरणात सुध्दा लावायला पाहिजे. मालेगाव येथील 3 वर्षीय मुलीच्या प्रकरणात सुध्दा हेच केलं पाहिजे. आरोपीला फाशी झाली आज नरसापूरच्या कुटुंबाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळाला आहे. संतोष देशमुख, महादेव मुंडे, मालेगाव या प्रकरणात तोच नियम लावायला पाहिजे, अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान सध्या राज्यभरात विलास घुले हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे, यावर देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा खूप अवघड आणि सिरीयस विषय आहे. यामध्ये आता मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे. परळी पॅटर्न राबवून खोटे गुन्हे दाखल झाले का? याची संपूर्ण माहिती घेणार. एसआयटीने याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि सखोल चौकशी केली पाहिजे. घुले बंधूला आणि कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करायला लावणार, शांत बसणार नाही. एसआयटी खोटा तपास करणार नाही. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव घेतले पण त्यात काही आढळून आले नाही, आता नवीन काय प्रकरण आहे, त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
