
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण आंदोलन त्यांनी राज्यातील गावागावापर्यंत पोहचवले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून मराठा आरक्षणासाठी ते लढा देत आहेत. त्यामुळे गेल्या तेरा महिन्यापासून अंतरवाली सराटी गावाचे नाव राज्यभर पोहचले. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांचा संपर्क पत्ता बदलणार आहे. ते आता सोलापूर-धुळे महामार्गावरील पैठण फाट्यावर आपले कार्य उघडत आहे. या ठिकाणी “छत्रपती भवन” नावाने त्यांचे नवीन कार्यालय तयार झाले आहे. शुक्रवारी जरांगे पाटील आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते त्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
मनोज जरांगे यांची प्रकृती अजून पूर्ण बरी झाली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अजूनही तब्येत बरी नाही. परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून सुट्टी घेत आहे. दसरा मेळाव्याला येणाऱ्यासाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे. जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. राज्यातील मराठयांची इच्छा होती दसरा मेळावा झाला पाहिजे. या मेळाव्याला राज्यभरातून अनेक जण येणार आहेत. दसरा मेळावा आहे पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका.
दसरा मेळाव्याला कोणी राजकारणी म्हणाला जाऊ नका. त्यांनी तुम्हाला अडवले तर त्यांची नावे सांगा. मी सर्व नेत्यांना सांगतो, मराठा समाजातील कार्यकर्त्यांना आडवे पडू नका. नारायणगडवर होणार दसरा मेळावा हा मराठा दसरा मेळावा नाही. या मेळाव्याला अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक दसरा मेळाव्याला येणार आहेत.
फडवणीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत. त्याची आम्हाला खात्री आहे. मी लोकसभेच्या अगोदर सांगितले होते, मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय सरकार निवडणूक घेणार नाही. निवडणूक लागण्या अगोदर मराठ्यांच्या मागण्याचा विचार करा, अन्यथा देवेंद्र फडवणीस यांच्या आयुष्यातील मोठी पश्चातापाची वेळ येईल. भाजपमधील मराठ्यांनी पण हाच विचार करा. त्यांनी फडणवीस यांना सांगा नाही तर माझा नाईलाज आहे. देवेंद्र फडवणीस यांनी निवडणूक लागण्या अगोदर मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.