एक पाऊल समतेचे, तेजस्विनी रणात तळपणार; नाशिकमध्ये होणार मुलींसाठी सैनिकी शिक्षण संस्था, पुढील वर्षी प्रवेश

| Updated on: Dec 02, 2021 | 11:24 AM

नाशिकमध्ये चक्क मुलींनी सैनिकी शिक्षण मिळणार आहे. त्यासाठी संस्था सुरू करायला सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेतलाय. औरंगाबादच्या सैनिकी शिक्षण संस्थेच्या धर्तीवर ही संस्था असणार आहे.

एक पाऊल समतेचे, तेजस्विनी रणात तळपणार; नाशिकमध्ये होणार मुलींसाठी सैनिकी शिक्षण संस्था, पुढील वर्षी प्रवेश
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः उभ्या महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरणारी आणि मुलगा-मुलगी भेद नष्ट करायला सहाय्य करणारी, मुलींच्या कर्तृत्वाला भरारी घेण्यासाठी मदत करणारी अजून एक आशावादी बातमी. ही राज्य सरकारकडून आलीय. आता नाशिकमध्ये चक्क मुलींना सैनिकी शिक्षण मिळणार आहे. त्यासाठी संस्था सुरू करायला सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पुढाकार घेतलाय. औरंगाबादच्या सैनिकी शिक्षण संस्थेच्या धर्तीवर ही संस्था असणार आहे. या संस्थेला मंत्री दादा भुसे यांनी मान्यता दिल्याचेही समजते.

30 दिवसांत मागवला अहवाल

मुंबईतील मंत्रालयात मंत्री दादा भुसे यांच्या दालनात एक झाली. यावेळी औरंगाबादच्या सैनिकी शिक्षण संस्थेच्या धर्तीवर नाशिकमध्ये मुलींसाठी संस्था सुरू करण्याचा निर्णय झाला. नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या समितीकडून याबाबत महिन्याच्या आत अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर यावर पुढील निर्णय होणार आहे.

‘एनडीए’मध्ये मागवले अर्ज

सर्वोच्च न्यायालयाने मुलींच्या सैनिकी शिक्षणाबाबत यापूर्वी निर्णय दिला आहे. केंद्राने या निर्णयाच्या अनुषंगाने सैन्यातही महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती सुरू केली आहे. विशेष म्हणजे पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या (एनडीए) प्रवेशपू्र्व परीक्षेसाठीही यंदा अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यामुळे ‘एनडीए’मध्ये दोन वर्षांच्या प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.

कशीय औरंगाबादची संस्था?

डेहराडूण येथील आरआयएमसीच्या संस्थेनंतर औरंगाबाद येथील सैनिकी शिक्षण संस्थेतून सर्वाधिक विद्यार्थ्यांची ‘एनडीए’साठी निवड होते. सैन्यात मराठी अधिकाऱ्यांची संख्या वाढावी म्हणून राज्य सरकारने 1977 मध्ये औरंगाबादेत सैनिकी शिक्षण संस्था सुरू केली. मात्र, येथे फक्त मुलांनाच प्रवेश दिला जातो.

2022-23 साठी होणार प्रवेश?

नाशिकमध्ये मुलींसाठी होणाऱ्या सैनिक शिक्षण संस्थेत 2022-23 साठी प्रवेश देण्याचा प्रयत्न राहणार आहे. मंत्र्यांच्या आदेशानंतर त्या दिशेने पावले पडत आहेत. तसे झाले तर मुलींनाही सैन्यात अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयाचे स्वागत होत आहे.

एक पाऊल पुढे

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची दारे ज्योतीबाई फुले यांनी खुली केली. आपल्याला इतका प्रबोधन आणि पुरोगामित्वाचा वारसा. मात्र, आपल्या डोक्यातली जळमटे अजून जात नाहीत. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे केंद्र बधले. त्याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातही होताना दिसतो आहे. यामुळे मुलगा-मुलगी यांच्यातील समानतेचे एक पाऊल पुढेच पडणार यात शंका नाही.

इतर बातम्याः

दगाबाज पावसाचा अवकाळी घाव, नाशिकचा शेतकरी हवालदिल; द्राक्ष, कांदा, स्ट्रॉबेरीला बसणार फटका

आले निमंत्रकांच्या मना…चक्क साहित्य संमेलनाध्यक्षांचे कथाकथन रद्द; संवादावर बोळवण, इतरांचे पुसूच नका…!

साहित्य संमेलन वादात भुजबळांची शिष्टाई, भाजप नेत्यांची नाराजी दूर; फडणवीस लावणार हजेरी