Girish Mahajan : महायुतीमधील मैत्रीपूर्ण लढतींच्या विषयावर गिरीश महाजन यांचं अत्यंत महत्वाचं वक्तव्य, स्पष्टपणे सांगितलं की..
Girish Mahajan : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीमध्ये रस्सीखेंच आहे. काही जागांवरुन शिवसेना-भाजपमध्ये मतभेद आहेत. मैत्रीपूर्ण लढती होणार अशी चर्चा आहे. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी चित्र स्पष्ट केलं आहे.

“संजय राऊत यांना म्हणा विधान परिषदेच्या 17 जागांपैकी एक जागा तरी निवडून आणा. रोजच्यासारखी काहीही बडबड करू नका. तुमच्याकडे वेळ आहे, चांगला प्रचार करा. संजय राऊत साहेब यांचं लक्ष फक्त बोल बच्चन करण्यावरच आहे. सकाळी उठले की मोदींवर टीका करतात, कधी मुख्यमंत्र्यांवर टीका करतात” अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. “कधी फिल्डवर जात नाहीत. बोलण्याशिवाय त्यांना दुसरं काही येत नाही. राज्यात त्यांचा कुठेही प्रभाव नाही” अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. “त्यांच्या पक्षावर तसेच त्यांच्या नेत्यांवर लोकांचा विश्वास नाही. विश्वास गमावलेले लोक आहेत. त्यांच्यावर न बोललेलं बरं. त्यांनी बडबड करत राहावे आम्ही निवडणुका जिंकत राहू” असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
“त्यांना म्हणा तुम्ही निवडणुकीत उभे रहा. तुमच्या जिल्ह्यातही निवडणूक आहे, त्या ठिकाणी बघू कोणाला शाप मिळतात आणि कोणाला पुण्य. बोलबच्चन हे लोक आहेत. यांनी त्यांचे त्यांचे लोक तरी संभाळावेत. त्यांचे त्यांचे लोक त्यांना सांभाळता येत नाहीत. पळून जातात” अशी टीका गिरीश महाजन यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केली.
लाडक्या बहिणींच्या अपात्रतेच्या मुद्यावर काय म्हणाले?
“त्या मोठ्या नेत्या झाल्या आहेत फार. त्या काय बोलल्या मला नाही माहिती” असं गिरीश महाजन रोहिणी खडसे यांच्याबद्दल म्हणाले. “काही टेक्निकल अडचण आहे. या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. तांत्रिक अडचणी जर लाडक्या बहिणीने पूर्ण केल्या तर सर्वांना मदत मिळणार” असं लाडक्या बहिणींच्या अपात्रतेच्या मुद्यावर गिरीश महाजन म्हणाले.
त्यांना आम्ही अर्ज मागे घ्यायला लावू
“कुठेही मैत्रीपूर्ण लढत अथवा कुठेही बंडखोरी होणार नाही. महायुतीमध्ये ज्या पक्षाला जागा मिळालेली आहे तोच पक्ष जागा लढवेल. कुठेही बंडखोरी आमच्यामध्ये होणार नाही. आमचे चार दिवस आमच्याकडे आहेत. ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांना आम्ही अर्ज मागे घ्यायला लावू” असं गिरीश महाजन म्हणाले.