Nitin Gadkari : मी एक असं गाव बांधतोय, ज्यात..नितीन गडकरी शेतकऱ्यांसाठी हा जो प्रोजेक्ट करतायत त्याला तोड नाही
"माझी पार्टी माझी विचारधारा याचा मला अभिमान आहे. मात्र विकास कामांमध्ये राजकारण करू नये. जो करेगा जात की बात उसको मारुंगा कसके लाथ. माणूस जातीने नव्हे तर चांगल्या गुणांनी मोठा होतो" असं नितीन गडकरी म्हणाले.

“दिल्लीत गेल्यापासून माझे सोलापुरात येणे कमी झाले. मात्र पूर्वी काम करत असताना वारंवार सोलापुरात येण्याची संधी मिळाली. माझ्या आईची एक भावनिक घटना आहे. तिच्या मृत्यूपूर्वी ती अक्कलकोट गाणगापूरला आली होती. त्यानंतर ती घरी आल्यावर मला म्हणाली. नितीन तुला आयुष्यात संधी मिळाली तर गाणगापूर, अक्कलकोट पंढरपूरचा रस्ता चांगला कर” अशी आठवणं केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली. “सुशीलकुमार शिंदे यांना मी आमंत्रित केलं होतं. सोलापूर मध्ये एकाच दिवशी 52 हजार कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन झालं. ते मला म्हणाले एवढी मोठी घोषणा केली, ही कामं होतील का? त्यावर मी म्हणालो हो सगळी पूर्ण होतील” असं नितीन गडकरी म्हणाले.
“सोलापूर शहरातील उड्डाणपूल करू शकलो नाही. त्याला क्लिअरन्स न मिळाल्याने ते काम होऊ शकलं नाही. आता त्याची रक्कम दुप्पट झाली आहे. मात्र आता प्रणिती शिंदे आणि ज्योती वाघमारे यांनी पुढाकार घ्यावा आणि मला दिल्लीत आठवण करून द्यावी मी ते करून देतो” असा शब्द नितीन गडकरी यांनी दिला. “मात्र आता हे काम लवकरच पूर्ण होईल आणि मी दिलेला शब्द लवकरच पूर्ण होईल. मला खोटं बोलायची सवय नाही मी जे होणार आहे ते सांगतो आणि ते पूर्ण करतो. खोटी आश्वासनं मी देत नाही” असं गडकरी म्हणाले.
हिमाचल प्रदेश प्रमाणे हा रस्ता होणार
“पुढील 2029 पर्यत सोलापूर जिल्ह्यात 1 लाख कोटी रुपयांची कामे करून देईन.अहमदनगर-करमाळा-सोलापूर चौपदरीकरण करणार आहे. जुना पुना नाका ते बोरामणी नाका उड्डाणपूल मंजूर. अहमदनगर ते अक्कलकोट रस्ता लवकरच मंजूर करतोय.सूरत-चेन्नई ग्रीन फिल्ड मार्ग हा सोलापूर जिल्ह्याचे नशीब बदलवणारा मार्ग आहे. हिमाचल प्रदेश प्रमाणे हा रस्ता होणार आहे” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
मुंबई ते बँगलोर साडेपाच ते सहा तासात पोहोचता येईल
“सोलापूर जिल्हा हा लॉजिस्टिक हब बनणार आहे. चेन्नई ते दिल्ली अंतर 400 किमी कमी होणार आहे. मुंबई ते बंगलोर नवीन ग्रीन फिल्ड हायवे करणार आहोत.आता नवीन एक्सप्रेस हायवे बनवणार. हा हायवे झाल्यावर मुंबई ते बँगलोर साडेपाच ते सहा तासात पोहोचता येईल” असं नितीन गडकरी म्हणाले.
पंढरपूरचा पूर्ण रिंग रोड मंजूर करणार
“आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्या मी मान्य करतो. सोलापूर रिंग रोडला मान्यता देतो. टेंभुर्णी ते पंढरपूर हा रस्ता प्रलंबित होता, त्याचे चौपदरीकरण करणार. पंढरपूरचा पूर्ण रिंग रोड मंजूर करणार आहोत” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
आळंदी ते पंढरपूर हा 12 हजार कोटी रुपयांचा पालखी महामार्ग
“आळंदी ते पंढरपूर हा 12 हजार कोटी रुपयांचा पालखी महामार्ग 80 टक्के पूर्ण झाला. तोडले बोन्डले 100 कोटींचा फ्लाय ओव्हर मंजूर करतो. अक्कलकोट गाणगापूर हा रस्ता खराब झालाय, तो लवकरच चांगला होईल. विकास कामांमध्ये राजकारण करू नये.
शेतकरी आता हवा इंधन तयार करणार
“लोक महापुरुषांची जात शोधतात. मात्र ते चुकीचे आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे तो ऊर्जादाता झाला आहे. इथेनॉलच्या माध्यमातून ते शक्य झाले आहे. शेतकरी आता हवा इंधन तयार करणार आहे. शेतकरी डांबर जाता आणि हायड्रोजन तयार करणार आहे. माझ्याकडे हायड्रोजनची कार आहे. त्याचं नाव मीराई आहे. मिराई म्हणजे भविष्य. आता शेतकरी हायड्रोजन तयार करणार. सीएनजी आणि इथेनॉल असा मिळून ट्रॅक्टर हवा आहे असे मी सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्याचे एक लाख रुपये वाचणार आहेत” असं नितीन गडकरी म्हणाले.
आयुष्यभर त्यांना वीज आणि पाणी मोफत देणार
“विदर्भात 10 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे आता ते थांबवण्यासाठी मी काम सुरू केले आहे. मी एक विलेज तयार करतोय त्यामध्ये 500 स्क्वेअर फुटाचे घर 5 लाखात देणार. आयुष्यभर त्यांना वीज आणि पाणी मोफत देणार. ग्रामीण आणि शहरी भागात विकासाचा असमतोल तयार झाला तो होऊ नये यासाठी प्रयत्न करणार. जगात चर्चा आहे की सुखांक किती आहे. आपला सुखांक वाढवणे हेच खरे राजकारण आहे” अंस नितीन गडकरी म्हणाले.
