पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, मोठी दुर्घटना टळली; नेमकं काय घडलं?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे तांत्रिक बिघाड झाला. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली असून, त्या आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने सभांना उपस्थित राहणार आहेत.

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, मोठी दुर्घटना टळली; नेमकं काय घडलं?
pankaja munde
| Updated on: Feb 03, 2026 | 12:18 PM

भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पंकजा मुंडे या लातूरमध्ये प्रचारसभेसाठी जात होत्या, अशी माहिती समोर येत आहे.

पंकजा मुंडे या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज पंकजा मुंडे या लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. या प्रचारसभेचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. या प्रचारसभेसाठी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने आकाशात झेपावणार इतक्यात त्यांच्या हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले.

यामुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील नियोजित सभांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असून, त्या थोड्याच वेळात लातूरकडे रवाना होतील, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे नियोजित कार्यक्रमांना विलंब झाला असला, तरी पंकजा मुंडे सर्व सभांना हजेरी लावणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. पंकजा मुंडे सुरक्षित असल्याचे समजताच समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

अजित पवारांचे विमान अपघातात निधन

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्देवी निधन झाले.  बुधवारी २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीत प्रचारसभेसाठी जात असताना त्यांचे विमान कोसळले. या भीषण अपघातात त्यांच्यासह एकूण पाच जणांना प्राण गमवावे लागले. या भीषण अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून, राजकारणातील एका पर्वाचा अंत झाल्याचे बोललं जात आहे. त्यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात आता सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.