Sunil Shinde : सचिन अहिर फुटताच वरळीचा खरा किंग मेकर सुनील शिंदेंनी इतक्या दिवसांपासून जे मनात साचलेलं ते बोलून टाकलं

Sunil Shinde : "वरळी शिवसेनेची आहे. ती व्यक्तीची होऊ शकत नाही. शिवसेनेची सामुदायिक ताकद आहे. अनेक शिवसैनिकांमध्ये धमक आहे. असे कोण आले, गेले मला काही विशेष वाटत नाही" अशी प्रतिक्रिया सुनील शिंदे यांनी दिली.

Sunil Shinde : सचिन अहिर फुटताच वरळीचा खरा किंग मेकर सुनील शिंदेंनी इतक्या दिवसांपासून जे मनात साचलेलं ते बोलून टाकलं
Sachin Ahir-Uddhav Thackeray
| Updated on: Jun 30, 2026 | 3:40 PM

आज वरळीच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. वरळीतून येणारे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंचं शिवबंधन तोंडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर हे ठाकरे कुटुंबाचे निकटवर्तीय बनले होते. आदित्य ठाकरेंसोबत सतत त्यांचा वावर असायचा. 2019 मध्ये सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केलेला. वरळीत खरी ताकद सुनील शिंदे यांची आहे. पण सचिन अहिर यांना मातोश्रीने जास्त जवळ केलं होतं. आज त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सुनील शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना पक्षाला घरचा आहेर दिला.

“आमच्या पण वरिष्ठांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे. त्यांचं ज्या पद्धतीने चाललं होतं, ते माझ्या लक्षात येत होतं. पण मी छोटा कार्यकर्ता असल्याने भाष्य केलं नाही” असं आमदार सुनील शिंदे म्हणाले. “सचिन अहिर यांच्या जाण्याने पक्ष म्हणून नुकसान झालय असं वाटत नाही. मी 18 वर्ष वरळीत शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो. पाच वर्ष नगरसेवक होतो. त्यानंतर सचिन अहिर यांचा पराभव करुन आमदार म्हणून निवडून आलो. आदित्य ठाकरे यांचा सहकारी म्हणून दोन निवडणुकीत त्यांच्यासोबत होतो” असं सुनील शिंदे यांनी सांगितलं. “वरळी शिवसेनेची आहे. ती व्यक्तीची होऊ शकत नाही. शिवसेनेची सामुदायिक ताकद आहे. अनेक शिवसैनिकांमध्ये धमक आहे. असे कोण आले, गेले मला काही विशेष वाटत नाही” अशी प्रतिक्रिया सुनील शिंदे यांनी दिली.

त्यांच्याबद्दल वेडवाकडं बोलणार नाही

“शिवसैनिक म्हणून आम्ही वरळीत आमचं काम करत राहू. वरळीतील शिवसेनेचं काम करत राहू” असं सुनील शिंदे म्हणाले. ठाकरेंनी आत्मचिंतन केलं पाहिजे का? यावर ते म्हणाले की, “मी काय म्हटलं आमच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. मला पक्ष प्रमुखांबद्दल आदर आहे त्याच्याबद्दल मी असं बोलणार नाही. मी आमच्या काही लोकांबद्दल म्हटलं, त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे कोणाला किती महत्व द्यायचं” “ठाकरे कुटुंबाबद्दल मला आदर आहे, श्रद्धा आहे, त्यांच्याबद्दल वेडवाकडं बोलणार नाही. हे मीडियाच्या माध्यमातून मोठे झालेले लोक आहेत. तिथला शिवसैनिक स्थिर आहे. येणारी कुठलीही निवडणूक असो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना यशस्वी होईल” असा विश्वास सुनील शिंदे यांनी व्यक्त केला.

Follow Us