श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी गॉलमध्ये भारतीय संघाने फडकवला तिरंगा, बीसीसीआयने Video केला शेअर
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारतासाठी खास आहे. स्वातंत्र्य दिन आणि 600 वा कसोटी सामना असा योग जुळून आला आहे.

भारत श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉलमध्ये होत आहे. या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि मनासारखा निर्णय घेता आला. भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासाठी हा महत्त्वाचा आणि विशेष सामना आहे. कारण भारतीय कसोटी क्रिकेटमधील 600वा कसोटी सामना आहे. त्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचं औचित्य आहे. त्यामुळे हा सामना भारतीय क्रिकेटर्स आणि क्रीडाप्रेमींसाठी खास असणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी भारतीय संघाने गॉलमध्ये तिरंग फडकवून देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिल यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जात आहे.
बीसीसीआयने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे की, “स्वातंत्र्य दिनानिमित्त पहिल्या भारत श्रीलंका कसोटी सामन्यापूर्वी तिरंगा फडकवण्यासाठी टीम इंडिया गॉल येथे एकत्र आली होती.” व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू एकसुरात राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. भारताचा हा 600वा कसोटी सामना असून अशी कामगिरी करणारा आशिया खंडातील पहिला देश आहे. तर इंग्लंड ऑस्ट्रेलियानंतरचा तिसरा संघ असणार आहे.
On the occasion of Independence Day, #TeamIndia gathered at Galle to hoist the Tricolour 🇮🇳 ahead of the First #SLvIND Test.#IndependenceDay pic.twitter.com/tHKIggV6AU
— BCCI (@BCCI) August 15, 2026
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी भारताला दोन्ही कसोटी सामने जिंकणं भाग आहे. कारण आता उर्वरित 9 कसोटी सामन्यात 7 सामने जिंकायचे आहेत. त्यात न्यूझीलंडचा दौरा भारतासाठी कठीण असणार आहे. दुसरीकडे, पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात येणार आहे. त्यामुळे दोन्ही दौऱ्यात विजयाचं गणित साध्य करणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे ही कसोटी मालिका 2-0 ने जिंकली तर अंतिम फेरीच्या आशा जिवंत राहतील.
दरम्यान भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला असून कर्णधार शुबमन गिलने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. गॉलचं मैदान प्रथम फलंदाजीसाठी चांगलं आहे.कारण तिसऱ्या दिवसापासून ही खेळपट्टी फिरकीला मदत करते. त्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान असणार आहे.
