सचिन अहिर यांच्या फुटीमागे भाजपचा हात? भाजपच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया काय?
सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजपने या फुटीत हात असल्याचा इन्कार करत उद्धव ठाकरेंच्या 'अहंकारी' वृत्तीला या स्थितीसाठी जबाबदार धरले. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी अहंकार सोडला असता तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले असते आणि महापालिकेसारखे मुद्देही सुटले असते.

सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर आता सचिन अहिर (Sachin Ahir) यांनीही आज उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच ठाकरे गटातही मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे हे गेल्या तीन दिवसांपासून अहिर यांच्या संपर्कात होते. त्यानंतरच हे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या ऑपरेशन टायगरमध्ये भाजपचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या गोष्टीत काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधला.सचिन अहिर यांनी उबाठातून जाणं हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सगळ्यात मोठा धक्का आहे. अहंकारी भाषा वापरल्याने त्यांचा पक्षा गेला. उद्धव ठाकरेंना अहंकार नडत आहे. त्यांनी अहंकार सोडावा, असं सांगतानाच सचिन अहिर यांच्या सोडण्यामागे भाजपचा यात काहीही संबंध नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
शिंदेंना उपमुख्यमंत्री केलं असतं…
उद्धव ठाकरे, संजय राऊत पदाधिकाऱ्यांशी वाईट वागले. जवळ आलेल्या कार्यकर्त्यांना ते लाथ मारतात. यवतमाळमध्ये संजय देशमुखचे कार्यकर्ते भेटायला आले, त्यांना देशमुखचे कार्यकर्ते म्हणून लांब केलं. बाळासाहेबांचे विचार पाळले असते तर ही वेळ आली नसती. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री झाले असते, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री केलं असतं तर काहीच समस्या आल्या नसत्या. महापालिका सुद्धा तुमच्याचकडे राहिली असती. घराणेशाहीमुळे ते बर्बाद झाले, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शिंदेंच्या नेतृत्वात काम करा…
दरम्यान, आशिष जयस्वाल यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजून अनेक लोक शिवसेनेत यायला इच्छुक आहेत. कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही हे एकनाथ शिंदे यांच्यावर अवलंबून आहे. आगे आगे देखो होता है क्या, असं सांगतानाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे, असा सल्ला आशिष जयस्वाल यांनी दिला आहे.
