याद राखा… तर तुमचे गाल अन् आमचा हात, मनसेचा इशारा; रिक्षा आंदोलन उद्ध्वस्त…
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून मनसे आक्रमक झाली आहे. परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात रिक्षा संघटनांनी संप पुकारल्यास सर्वसामान्यांना त्रास होईल, असे मनसेने म्हटले आहे. 'तुमचे गाल अन् आमचा हात' या शब्दांत मनसेने संपकरी संघटनांना कडक इशारा दिला आहे. मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन केल्यास मनसे शांत बसणार नाही.

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी ‘मराठी अनिवार्य’ करण्याच्या निर्णयावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाला काही रिक्षा संघटनांनी विरोध करत संपाचं हत्यार उपसलंय. मात्र, या संपाविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. “मराठीच्या मुद्द्यावरून जर संप पुकारून सर्वसामान्यांना वेठीस धरलं, तर याद राखा,” असा सज्जड दम मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे. “तुमचे गाल आणि आमचा हात” या शब्दांत त्यांनी संपकरी संघटनांना ठणकावून सांगितलंय.
परिवहन विभागाने रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्यानंतर, परप्रांतीय बहुल असलेल्या काही रिक्षा संघटनांनी ४ तारखेला संपाचा इशारा दिला आहे. या संपाच्या इशाऱ्यामुळे मनसे आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून, कल्याणमध्ये मनसेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
15 लाख रिक्षा येणार कुठून?
मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी संप पुकारणाऱ्या नेत्यांच्या अभ्यासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “काही लोक 4 तारखेला 15 लाख रिक्षा घेऊन आंदोलनाचा इशारा देत आहेत. मुळात ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली मिळून 4 लाख रिक्षा आहेत. मग हे उरलेले 11 लाख लोक काय यूपी-बिहारमधून येणार आहेत का? असा खोचक सवाल भोईर यांनी विचारला आहे. तसेच, जर बाहेरून लोक येणार असतील, तर त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
तर गाठ आमच्याशी!
रिक्षा संघटनांच्या संपावर बोलताना उल्हास भोईर म्हणाले की, “मराठी भाषेच्या निर्णयाला विरोध करून जर मराठी माणसाला त्रास दिला, तर तो आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. मराठी माणसावर अन्याय झाला तर ‘आमचा हात आणि त्यांचे गाल’ हे ब्रीदवाक्य आम्ही सार्थ ठरवू.” इतिहासाची करून दिली आठवण कल्याण-डोंबिवलीकरांनी यापूर्वी रेल्वे भरतीवेळी झालेल्या अन्यायाविरोधात मोठे आंदोलन उभे केले होते, याची आठवण करून देत भोईर यांनी इशारा दिला की, “येत्या 4 तारखेला जर मराठी अस्मितेवर आणि माणसावर अन्याय झाला, तर ते आंदोलन मोडून काढण्यासाठी कल्याण-डोंबिवलीचा वाटा सर्वात मोठा असेल.