Pravin Darekar | सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही, तोंडाची वाफ घालवण्यापलिकडे नाना काही करू शकत नाही, प्रवीण दरेकरांच्या कानपिचक्या

केवळ शाब्दिक आरोप करण्यापलिकडे नाना पटोलेंची हिंमत नाही, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे. तसेच त्यांच्या वादावर आम्ही फार प्रतिक्रिया देणार नाहीत, असंही वक्तव्यही त्यांनी केलं.

Pravin Darekar | सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही, तोंडाची वाफ घालवण्यापलिकडे नाना काही करू शकत नाही, प्रवीण दरेकरांच्या कानपिचक्या
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 11, 2022 | 2:08 PM

मुंबईः महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाल्याच्या बातम्या येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर राष्ट्रवादीने (NCP) पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप केला आहे. अनेक स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढत असल्याचे चित्र असल्यामुळे महाविकास आघाडीची ही फसवणूक असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. मात्र नाना पटोले हे फक्त आरोप करण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत, अशा कानपिचक्या भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे केवळ शाब्दिक आरोप करण्यापलिकडे नाना पटोलेंची हिंमत नाही, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे. तसेच त्यांच्या वादावर आम्ही फार प्रतिक्रिया देणार नाहीत, असंही वक्तव्यही त्यांनी केलं.

महाविकास आघाडीवर काय म्हणाले दरेकर?

नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, ‘ आता त्यांना खंजीरच्या पण गुदगुल्या होत असतील. तर त्याला आम्ही काय म्हणायचं? पण एकिकडे खंजीर खुपसला म्हणायचं आणि दुसरीकडे मांडीला मांडी लावून बसायचं. सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत आहे का… तर नाहीये. त्यामुळे तोंडाची वाफ घालवण्यापलिकडे नाना काही करू शकत नाहीत, असं वक्तव्य दरेकर यांनी केलं. ते वाद घालतील, सत्तेत राहतील काहीही करतील. आम्ही एकमेकांना घट्ट पकडून आहोत असेही ते म्हणतील, त्यामुळे महाविकास आघाडीतील वादावर आम्ही फार बोलणार नाहीत, असेही दरेकर म्हणाले.

‘राजद्रोहावर सरकार आता योग्य ती कारवाई करेल’

राजद्रोहाचे कलमच आज सुप्रीम कोर्टाने स्थगित केले आहे. आतापर्यंत विविध मतप्रवाह होते. पण आता कोर्टाचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कारवाई करेल, अशी अपेक्षा प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात महाविकास आघाडी सरकारने राजद्रोहाचे कलम लावले आहे. मात्र आज सुप्रीम कोर्टाने हे कलमच रद्द ठरवले.

‘मनसेसोबतची वर्तणूक अशोभनीय’

मनसेच्या कार्यकर्त्यांची राज्य सरकारने जी धरपकड चालवली आहे, त्यावर भाष्य करताना प्रवीण दरेकर म्हणाले, ‘ ज्या पद्धतीने या सरकारने हैदोस घातला आहे. खोट्या केसेस टाकणे, पोलिसांचा गैरवापर करणे आदी प्रकार सुरु आहेत. मला वाटतं राज्याच्या इतिहासात कोणत्याही सरकारने अशा प्रकारे कारवाई केली नसेल. मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी जणू दहशतवादी असल्याप्रमाणे सर्च ऑपरेशन सुरु आहे. हे सरकारला शोभणारं नाही, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.