खुशखबर ! मुंबई-कोकण आता अवघ्या चार तासात, कसं? मग ही बातमी वाचाच..

मुंबई-कोकणचा प्रवास आता अवघ्या चार तासांत होणार आहे! ३७६ किलोमीटर लांबीचा हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणातील पर्यटन आणि उद्योगाला यामुळे मोठी चालना मिळेल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल. मुंबई-कोकणचा नियमित प्रवास करणाऱ्यांचा वेळ आणि इंधनाची बचत होईल.

खुशखबर ! मुंबई-कोकण आता अवघ्या चार तासात, कसं? मग ही बातमी वाचाच..
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 02, 2025 | 2:16 PM

मे महिन्याची सुट्टी लागली की कोकणात जायला सर्वांनाच आवडतं. आंबे, काजूच मटकावायला, निळाशार, फेसाळ समुद्र आणि शांतता अनुभवायला अनेकांची पावलं तिकडे पडत असतात. गणपतीत तर सणा-सुदीचा उत्साह जोरदार असतो, कोकणात राहणारे पण मुंबईत राहणारे अनेक नागरिकही घरच्या ओढीने गावाला पळतात.   पण कोकणात जाणारा वेळ, गाडीची फुल बूकिंग यामुळे अनेकदा तिथे जाणं जिकीरीच होतं. मात्र आता कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. कारण मुंबई-कोकण हा मोठ्ठा प्रवास आता अवघ्या चार तासांत करता येणार आहे. कोकणासाठी गेम चेंजर हायस्पीड ग्रीनफिल्ड महामहामार्गाची रूपरेषा जाहीर झाली आहे.

सिंधुदुर्गातून अवघ्या चार-पाच तासांत मुंबईला जाता येईल, अशा सागरी महामार्गाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी चार मोठ्या खाडीपुलांची निर्मिती केली जात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच रत्नागिरी येथे जाहीर केले.

हा हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्ग 376 किलोमीटर लांबीचा असणार आहे. तसेच या हायस्पीड ग्रीनफिल्ड महामहामार्गामध्ये 41 बोगदे, 51 मोठे ब्रीज आणि 68 ओव्हरपास असतील. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी एकूण 68 हजार 720 कोटी रुपये खर्च येणार आहे.

या हाय स्पीड महामार्गावर 6 मार्गीका असतील आणि 100 मीटर रुंदीचा हा महामार्ग असेल असे समजते. त्यासाठी एकूण 3 हजार 792 हेक्टर जमीन देखील संपादित केली जाणार आहे. तसेच सागरी महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग आणि हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्ग हे एकमेकांना जोडले जाणार आहेत.

अलिबाग- शहाबाद- रोहा, माणगाव- मेढेगाव, मंडणगड- दापोली- गुहागर शहर- गणपतीपुळे, राजापूर-भालवली-देवगड शहर, मालवण-कुडाळ-सावंतवाडी अशा मार्गावरून हा महामार्ग जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. प्रस्तावित सागरी महामार्गामुळे कोकणातील सुंदर किनारे जोडले जातील. हा मार्ग कोकणसाठी गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. तसेच या महामार्गामुळे या भागात उद्योगाला, पर्यटनाला आणि पर्यायाने विकासालादेखील चालना मिळेल. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांना फायदा होईल आणि या मार्गामुळे मुंबई-कोकण नियमित प्रवास करणाऱ्यांच्या तसेच पर्यटनासाठी देखील इथे येणाऱ्या नागरिकांच्या वेळेची व इंधनाची बचत होईल.