
सध्या नवरात्रौत्सव सुरु आहे. याच नवरात्रीनंतर कोकणवासियांना सरकारकडून एक मोठे गिफ्ट मिळणार आहे. कोकणवासियांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेली मुंबई ते कोकण ‘रो-रो’ (Roll-On/Roll-Off) सेवा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणार आहे. येत्या २ ऑक्टोबरला दसरा आहे. या शुभ मुहुर्तावर ही रो-रो सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबईतील चाकरमान्यांचा कोकण प्रवास सुखकर होणार आहे.
मुंबई ते कोकण ही रो रो सेवा सुरु होण्यास विविध अडचणी येत होत्या. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध परवानग्या तसेच पावसाळ्यातील हवामानाचे अडथळे यामुळे ही सेवा अद्याप सुरु करण्यात आली नव्हती. पण आता सागरी महामंडळाने अथक प्रयत्न करत हे सर्व अडथळे यशस्वीरित्या दूर केले आहेत. यानंतर आता दक्षिण आशियातील सर्वात वेगवान जलप्रवासाचा हा मार्ग सुरु होणार आहे. यामुळे आता मुंबई-कोकण प्रवासाला एक नवा आणि अतिजलद पर्याय उपलब्ध होणार आहे. रस्त्याच्या मार्गे लागणाऱ्या १० ते १२ तासांच्या तुलनेत जलमार्गाने हा प्रवास अवघ्या तीन ते साडेपाच तासांत पूर्ण होईल, ज्यामुळे कोकणवासियांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.
या रो-रो सेवेचा प्रवास मुंबईतील भाऊचा धक्का (Ferry Wharf) येथून सुरू होईल. तो रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग असा असणार आहे. जलमार्गाने होणाऱ्या या प्रवासाने वेळेत मोठी बचत होणार आहे. मुंबई ते रत्नागिरी (जयगड) या ठिकाणचा प्रवास रो-रो सेवेमुळे फक्त तीन तासांत पूर्ण होणार आहे. तर मुंबई ते सिंधुदुर्ग (विजयदुर्ग) हा प्रवास केवळ पाच ते साडेपाच तासांत पूर्ण करता येणार आहे.
या रो-रो सेवेची क्षमता प्रचंड असून एका वेळी ती ६५० हून अधिक प्रवासी घेऊन जाऊ शकते. विशेष म्हणजे ‘रोल-ऑन/रोल-ऑफ’ या संकल्पनेमुळे प्रवासी त्यांच्या कार, दुचाकी आणि सायकली देखील सोबत घेऊन जाता येणार आहे. यामुळे कोकणचा प्रवास केवळ जलदच नाही, तर आरामदायी आणि सुलभ होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते. यामुळे प्रवासात विलंब होतो. आता ही रो-रो सेवा सुरु झाल्यावर कोकणवासीयांच्या प्रवासासाठी गेम चेंजर ठरणार आहे. दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर सुरू होणारी ही जलवाहतूक सेवा कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.