मँहगाई डायन खाए जात है! 1 एप्रिलपासून टोलच्या रकमेत वाढ, प्रवाशांना मोठा भुर्दंड

१ एप्रिल २०२४ पासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल दरात ३% वाढ होणार आहे. चारचाकी वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी ५ रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी १० रुपये वाढ करण्यात येणार आहेत. इतर वाहनांसाठी १५ ते २० रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित आहे.

मँहगाई डायन खाए जात है! 1 एप्रिलपासून टोलच्या रकमेत वाढ, प्रवाशांना मोठा भुर्दंड
mumbai pune expressway toll
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 19, 2025 | 9:24 AM

गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या भाजीपाला, फळं, किराणा सामान यांचे दर वाढले आहेत. त्यातच दूधाच्या दरातही 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. एकीकडे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता टोल दरवाढीचा भुर्दंडही सहन करावा लागणार आहे.

जर तुम्ही नियमित मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिलपासून टोल दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मुंबई -पुणे एक्सप्रेस महामार्गावर वाहनधारकांकडून घेतल्या जाणारी टोलची रक्कम 3 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

परतीच्या प्रवासासाठी 10 रुपयांचा भुर्दंड

यानुसार आता मुंबई -पुणे एक्सप्रेस महामार्गावरुन प्रवास करताना चारचाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त 5 रुपये मोजावे लागणार आहेत. तर परतीच्या प्रवासासाठी 10 रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर ही टोल दरवाढ लागू होणार आहे.

एनएचएआयच्या अधिकाऱ्यांच्या मते, दरवर्षी टोलच्या दरांमध्ये 1 एप्रिल रोजी बदल केला जातो. वाहनाच्या प्रकारानुसार ही दरवाढ लागू  केली जाते. चारचाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी टोल दरात 5 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 10 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच इतर श्रेणींतील वाहनांसाठी सरासरी 15 ते 20 रुपयांपर्यंतची टोल दरवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे.

फास्ट टॅग नसेल तर दुप्पट टोल भरावा लागणार

दरम्यान येत्या 1 एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्ट टॅग लावणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तुमच्या कारला फास्ट टॅग लावणे बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही रोख, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला तर तुम्हाला टोलचे पैसे डबल भरावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. टोलची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोलवरील लागणारा वेळ आणि फास्ट टॅगचा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांना फास्ट टॅग लावणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. फास्ट टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळली आहे.

यामुळे १ एप्रिलपासून राज्यातील सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. फास्ट टॅग न वापरणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट रोख रक्कम द्यावी लागणार आहे. हा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निश्चित केलेल्या धोरणांशी आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशाशी सुसंगत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.