
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळआला आहे. मध्य रेल्वेने मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय केली आहे. रेल्वे प्रशासनाने सुमारे २५० विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची योजना आखली आहे. ज्यामुळे बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर होणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण २४ जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी लवकरात लवकर बुकींग करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. या गाड्यांमुळे मुंबई, पुणे आणि गुजरातसह विविध भागांतून येणाऱ्या गणेशभक्तांचा कोकणातील प्रवास आणखी सोयीचा होणार आहे. येत्या २४ जुलैपासून विशेष गाड्यांसाठी आरक्षण सुरू होईल. अनारक्षित डब्यांसाठी तिकीट आरक्षण (UTS) अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार करता येईल. मध्य रेल्वेकडून गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. या रेल्वे गाड्या कोकण रेल्वेमार्गे धावणार आहेत. या गाड्या मुंबई, पुणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव आणि चिपळूण या प्रमुख स्थानकांपर्यंत धावतील. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ५ विशेष रेल्वे फेऱ्या जाहीर केल्या आहेत. या गाड्या देखील गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन चालवण्यात येणार आहेत.
बाप्पाच्या विसर्जनासाठी पालिकेची जय्यत तयारी
त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेने (BMC) मोठ्या उत्साहात बाप्पााच्या विसर्जनाचीही तयारी केली आहे. यंदा मूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबईत तब्बल २५० कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. यामुळे सार्वजनिक आणि घरगुती दोन्ही प्रकारच्या गणेशमूर्तींचे विसर्जन सोयीस्करपणे करता येणार आहे. विशेष म्हणजे, विसर्जन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा देखील उपलब्ध केली जाईल. यामुळे भाविकांना ठरलेल्या वेळेत आपल्या बाप्पाचे विसर्जन करता येईल आणि गर्दी टाळता येईल.
मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि सव्वा लाख घरगुती गणेशोत्सव साजरे होतात. या मूर्तींचे विसर्जन पालिकांनी बनवलेले कृत्रिम तलाव किंवा समुद्र व इतर नैसर्गिक जलस्थळांवर केले जाते. यंदा पीओपी (Plaster of Paris) मूर्तींवर समुद्रात किंवा नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन करण्यास बंदी असल्यामुळे, महानगरपालिकेने कृत्रिम तलावांची संख्या लक्षणीय वाढवली आहे. विसर्जनस्थळी भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पालिकेचे सुमारे २५ हजारहून अधिक कर्मचारी तैनात राहणार आहेत. हे कर्मचारी विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत करतील आणि भाविकांना मार्गदर्शन करतील.