शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश

| Updated on: Feb 17, 2021 | 9:09 PM

शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रायगडावर 24 तास प्रवेश दिला जाणार आहे.

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश
Follow us on

रायगड : शिवजयंतीनिमित्त सरकारने शिवभक्तांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रायगडावर 24 तास प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासात पुरातत्व विभागानं मान्यता दिली. एरवी किल्ल्यावर सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किल्ल्यावर पर्यटकांना परवानगी असते.(2 days free admission to Raigad fort on Shiv Jayanti day)

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि त्यातून निर्माण होणारा कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. शिवजयंती दिनी मुंबईत कलम 144 लागू केलं आहे. त्यामुळे मराठा संघटना आणि शिवभक्त अधिक आक्रमक झाले आहेत.

मराठा क्रांती मोर्चाची बॅनरबाजी

राज्य सरकारने शिवजयंतीच्या सोहळ्यावर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करून निषेध करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याला झालेली गर्दी किंवा शरद पवारांचा वाढदिवस असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रा यावेळी झाली गर्दी त्यामुळे करोना होत नाही का, असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेला विचारण्यात आला आहे.

मात्र, पोलिसांनी काहीवेळातच शिवसेना भवनासमोर लावलेला हा बॅनर उतरवला. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चा काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीच्या सोहळ्यावर लादलेल्या निर्बंधांमुळे राज्य सरकारवर सध्या टीकेचा भडीमार होत आहे.

100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला अवघ्या दहा लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली होती. त्यावर विरोधकांनी टीका केल्यानंतर अखेर राज्य सरकार बॅकफूटवर आलं आहे. सरकारने अखेर नवी नियमावली जारी करून शिवजयंतीला आता 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या गृहविभागाने हे नवीन परिपत्रक जारी केलं आहे.

बाईक रॅली, प्रभात फेरीला मज्जाव

तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं त्यात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

सरकार बॅकफूटवर, शिवजयंतीसाठी नवी नियमावली; 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी

शिवजयंती धडाक्यात साजरी करणारच; शिवसेना भवनासमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी

2 days free admission to Raigad fort on Shiv Jayanti day