ईडी सरकार मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा त्वरित करावी; मुंबई आम आदमी पार्टीने एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा

| Updated on: Aug 03, 2022 | 9:23 PM

गेल्या वर्षी आर्थिक आणि कृषी संकटामुळे राज्यात 2459 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रीयांच्या जीवाची पर्वा नाही का? असा सवालही त्यांनी त्यावेळी उपस्थित केला.

ईडी सरकार मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा त्वरित करावी; मुंबई आम आदमी पार्टीने एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा
Follow us on

मुंबईः एक महिना उलटला तरी मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet expansion) झाला नसून मुख्यमंत्री मात्र मिरवणूका घेऊन शक्ती प्रदर्शन करण्यात व्यस्त आहेत, असा टोला आम आदमी पार्टीच्या मुंबई (Aam Aadmi Party Mumbai) अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लगावला आहे. एक महिना उलटला तरी मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. तसेच महाराष्ट्रातील सुरू असलेल्या राजकारणा संदर्भात आम आदमी पार्टीच्या मुंबई आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी फोर्ट येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दोन मंत्री मिळून सुरू असलेल्या राज्यसरकारला चांगलेच धारेवर धरले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, बंडखोरी होऊन शिंदे यांचा मुख्यमंत्री आणि फडणवीस यांचा  उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होऊन एक महिना झाला आहे.

 

या एका महिन्यात त्यांना मंत्रिमंडळ तयार करण्यात अपयश आले आहे आणि या एका महिन्यात त्यांच्यापैकी कोणते खाते कोणते मंत्रिमंडळाकडे बघितले जात आहे याची माहिती देण्यातही त्यांना अपयश आले असल्याची टीका प्रीती शर्मा मेनन यांनी केली.

नागरिकांच्या समस्या जैसे थे

पावसाळी अधिवेशन ही अशी वेळ असते जेव्हा सर्व प्रतिनिधींनी आपापल्या भागातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडायच्या असतात. असे न झाल्याने विविध नागरिकांच्या समस्या ज्या अधिवेशनात चर्चा करून सोडविल्या जाणार होत्या, त्या सोडविल्या गेल्या आहेत. महाराष्ट्राला काही भागात अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे तर काही भागात पावसाची कमतरता आहे.

राज्यात 2459 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

गेल्या वर्षी आर्थिक आणि कृषी संकटामुळे राज्यात 2459 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रीयांच्या जीवाची पर्वा नाही का? असा सवालही त्यांनी त्यावेळी उपस्थित केला.

एकाच दिवसात सुमारे पाच हजार कोटींची निविदा

मुंबईतील रस्त्याच्या दुरावस्थेला इतके दिवस उलटल्यानंतर पालिकेला रस्त्यांची दुरूस्ती करण्यासाठी 5 हजार 800 कोटी रूपये खर्च करण्याची जाग आली आहे. मुंबई महानगरपालिकेने एकाच दिवसात सुमारे पाच हजार कोटींची निविदा प्रक्रिया एकाच दिवसात राबवली. इतक्या मोठ्या प्रमाणात निविदा काढण्यासाठी नेमके कोणाच्या सांगण्यावरून पालिकेत कारभार सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेत ज्या पद्धतीने निविदा निघताहेत त्यानुसार शिवसेना पालिकेत नामशेष झाली आहे. याठिकाणी भाजपच्या मागणीनुसारच निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.

मुख्यमंत्री शक्ती प्रदर्शन करण्यात व्यस्त

पावसाळ्यासारख्या काळात जेव्हा सरकार सक्रिय व्हायला हवे होते त्यावेळी मुख्यमंत्री शक्ती प्रदर्शन करण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्याचे अधिकार आहेत. उपमुख्यमंत्री यांना खातंच दिलेलं नाही. जनतेच्या समस्या सोडविण्यास सरकार अपयशी ठरले असून एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंत्रिमंडळ स्थापन करावे आणि राज्यकारभाराचे काम सुरू करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष द्विजेंद्र तिवारी म्हणाले.