मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु होण्याआधीच मोठा पराक्रम, अवघ्या 3 तासात…

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात १५० हत्तींच्या वजनाइतका १,३६० मेट्रिक टनचा गर्डर अवघ्या साडेतीन तासांत बसवून नवा विक्रम प्रस्थापित केला.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु होण्याआधीच मोठा पराक्रम, अवघ्या 3 तासात...
Ahmedabad-Mumbai Bullet Train
| Updated on: Apr 13, 2026 | 9:28 AM

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे. त्यातच आता अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या बांधकामात भारतीय रेल्वेने एक मोठा अभियांत्रिकी पराक्रम गाजवला आहे. मणिनगर-अहमदाबाद सेक्शनवर तब्बल १,३६० मेट्रिक टन वजनाचा विशाल आरसीसी पोर्टल बीम यशस्वीपणे बसवण्यात आला आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (NHSRCL) मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झाले आहे. ही घटना भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरली आहे.

क्रेनचे वैशिष्ट्य काय?

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण २२००-टन क्षमतेची क्रॉलर क्रेन ठरली. भारतीय रेल्वेच्या बांधकामात एवढ्या मोठ्या क्षमतेची क्रेन वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही क्रेन इतकी अवाढव्य आहे की, तिला साइटवर आणण्यासाठी ११० पेक्षा जास्त ट्रेलरचा ताफा लागला. तज्ज्ञ अभियंत्यांच्या देखरेखीखाली ही क्रेन टप्प्याटप्प्याने जोडण्यात आली. यानंतर सुपर-लिफ्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने १५० हत्तींच्या एकत्रित वजनाइतका भार उचलून तो योग्य ठिकाणी ठेवणे या क्रेनसाठी शक्य झाले.

हा पोर्टल बीम ३४ मीटर लांब, ५.५ मीटर रुंद आणि ४.५ मीटर उंच आहे. दीर्घकाळ टिकण्यासाठी आणि वजनाचा ताण सहन करण्यासाठी यात ‘एम५०’ (M50) ग्रेडच्या उच्च दर्जाच्या काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. यावेळी कामाच्या अचूक नियोजनामुळे ३ तास ३० मिनिटांत रेल्वे ट्रॅकच्या वर हा बीम बसवण्यात आला. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यंत सावधगिरीने रेल्वे वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती.

हा मार्ग ऐतिहासिक मणिनगर भागातून जातो, जो एकेकाळी गुजरातच्या विकासकामांचे केंद्रबिंदू होता. आता याच मार्गावरून देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. बुलेट ट्रेनचा हा मार्ग मणिनगरचे तिन्ही पारंपरिक रेल्वे मार्ग ओलांडून, कांकरिया परिसरातील जुन्या रेल्वे कॉलनीच्या क्रिकेट मैदानातून पुढे साबरमती मल्टी-मोडल ट्रान्झिट हबच्या दिशेने जाणार आहे.

भारताच्या दळणवळण व्यवस्थेत क्रांती

प्रकल्प अभियंता शौर्य राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा केवळ एक भाग होता. पुढील टप्प्यांमध्ये, प्रत्येक सहा दिवसांच्या अंतराने पी०६ ते पी०९ या श्रेणीतील पोर्टल बीम्स बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रत्येक बीमचे वजन १,०७० ते १,११० टन दरम्यान असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अचूक नियोजन आणि उत्कृष्ट समन्वय यामुळे हा प्रकल्प केवळ भारतासाठीच नव्हे, तर जागतिक अभियांत्रिकी क्षेत्रासाठी एक अभिमानास्पद उदाहरण बनत आहे. यामुळे भारताच्या दळणवळण व्यवस्थेत क्रांती घडण्यास मोठी मदत होणार आहे.

Follow Us