VIDEO: अरे बाबा ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहू दे; अजितदादांनी आमदारांना फटकारले

| Updated on: Dec 28, 2021 | 2:19 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत बेशिस्त आमदारांना चांगलेच चिमटे काढले. आपण कसे वागतो याचं सदस्यांना जराही भान राहिलेलं नाही.

VIDEO: अरे बाबा ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहू दे; अजितदादांनी आमदारांना फटकारले
ajit pawar
Follow us on

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत बेशिस्त आमदारांना चांगलेच चिमटे काढले. आपण कसे वागतो याचं सदस्यांना जराही भान राहिलेलं नाही. सभागृहात येताना जाताना नमस्कार करायचा याचंही सदस्यांना भान राहिलं नाही. काही सदस्य तर एकदा निवेदन दिल्यानंतर पुन्हा दहा मिनिटाने निवेदन द्यायला येतात, असं सांगतानाच एक सदस्य तर थेट मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीवर येऊन बसला. शेवटी त्याला अरे बाबा, ही मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे. तेवढी तरी राहू दे असं म्हणण्याची वेळ आली, असं अजित पवार यांनी सांगितलं.

अजित पवार यांनी आज विधानसभेत सदस्यांना शिस्तपालनावरून कान टोचले. सुरुवातीला मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा. ते उभे असतील तर आम्ही क्रॉस करायचो नाही. आता तर आमच्या सीटवर कोणीही येऊन बसतो. मुख्यमंत्र्यांच्य खुर्चीवरही येऊन बसतात. त्यांना म्हटलं तेवढी तरी राहू दे. तुला 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस. पण सदस्य ऐकत नाही, असं पवार म्हणाले.

अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते

सभागृहातील शिस्तीवरही त्यांनी भाष्य केलं. पूर्वी कॅबिनेटमंत्री पुढे बसायचे. आम्ही पाठी बसून त्यांच्याशी बोलायचो. त्यांना सभागृहात डिस्टर्ब करायचो नाही. आता एक पत्र दिल्यावर दहा मिनिटाने दुसरं पत्रं देतात. अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा. पण सर्वांनी शिस्त पाळा. क्रॉसिंग तर कुणाला कळत नाही. कोण कुठं उभं आहे… काय आहे… हेच माहीत नाही. कसंही क्रॉसिंग केलं जातं. तिथं तर बऱ्याचदा बोलत असतात. इथं कोणतरी बोलत असतात. अध्यक्षांकडे पाठ असते. अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते. आल्यावर त्यांना नमस्कार करून बसायचे असते. जातानाही नमस्कार करायचा असतो एवढी साधी गोष्टही त्यांना कळत नाही, असंही ते म्हणाले.

सभागृहाच्या प्रतिमेला तडा गेला

विधीमंडळ सर्वोच्च असून इतक्या वर्षांच्या सभागृहाच्या प्रदिर्घ वाटचालीत विधीमंडळ सभागृहाने उच्च मूल्य प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदाराने आदर्श आचारसंहितेचे पालन करत जबाबदारीने वागले पाहिजे. विधानसभेत आमदार निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरत असते. काही सदस्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच तडा गेला आहे‌. आता सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केलं.

‌कुत्रे, मांजर, कोंबड्यांचे प्रतिनिधीत्व करत नाही

ज्यावेळी आम्ही निवडून आलो.‌ त्याकाळात विधीमंडळाचे कामकाज लाईव्ह होत नव्हते. परंतु आता दोन्ही सभागृहाचे कामकाज लाईव्ह होते. राज्य आणि माध्यमे आपल्याकडे पहात आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संसदीय शिष्टाचाराचे पालन केले पाहिजे. आमदारांना दोन – दोन लाख मतदार मतदान करुन विधानसभेत पाठवत असतात. त्यांचे प्रतिनिधीत्व आमदाराला करायला हवे‌. कुत्रे, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवावे अशा शब्दात अजित पवार यांनी सर्वांना खडसावले.

संबंधित बातम्या:

12 आमदारांच्या निलंबनावर अजित पवार भाजपसोबत? 12 महिने कुणाला बाहेर न बसवण्याचं वक्तव्य

हा कसला सेनेचा आमदार, काय स्वत:ला शिवसैनिक म्हणवतो, लेकीवरील हल्ल्यानंतर खडसे आक्रमक

आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का? वाघाची मांजर कधी झाली? नारायण राणेंचा सवाल