केंद्र सरकारचे 2 निर्णय चांगले, 4 निर्णय अतिशय वाईट, मोदींनी विश्वास गमावला; अरविंद सावंतांची टीका

| Updated on: May 30, 2021 | 4:03 PM

केंद्रीतील मोदी सरकारने सात वर्ष पूर्ण केले आहेत. त्यावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. (arvind sawant attacks bjp over Modi government's seventh anniversary)

केंद्र सरकारचे 2 निर्णय चांगले, 4 निर्णय अतिशय वाईट, मोदींनी विश्वास गमावला; अरविंद सावंतांची टीका
अरविंद सावंत, शिवसेना खासदार
Follow us on

मुंबई: केंद्रीतील मोदी सरकारने सात वर्ष पूर्ण केले आहेत. त्यावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. या सात वर्षात आम्ही मोदींसोबत होतो. या सरकारने गेल्या सात वर्षात दोन निर्णय चांगले घेतले आणि चार निर्णय अतिशय वाईट घेतले, असं सांगतानाच मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली. (arvind sawant attacks bjp over Modi government’s seventh anniversary)

अरविंद सावंत यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना मोदी सरकारच्या सात वर्षाच्या कारभारावर भाष्य केलं. मोदींनी केंद्रात सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण केले आहेत. आम्ही त्या सात वर्षात काही वर्ष त्यांच्यासोबत होतो. गेल्या 70 वर्षात काहीच चांगलं झालं नाही, असं आम्ही म्हणणार नाही. 70 वर्षातही चांगली कामे झाली असंच आम्ही म्हणू. कदाचित आम्ही दोन पाऊल पुढेही असू, असं सांगतानाच या सात वर्षात 370 कलम रद्द झालं आणि राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला हे दोन निर्णय चांगले झाले, असं सावंत म्हणाले.

नोटाबंदीने बेरोजगारी वाढली

राम मंदिर आणि 370 कलमाबाबत शिवसेनेची भूमिका जगजाहीर आहे. आम्ही ती वेळोवेळी मांडली आहे. शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका सातत्याने रेटली आहे. त्यामुळे या दोन गोष्टी सात वर्षात चांगल्या झाल्या. पण नोटाबंदी, जीएसटी, कामगार कायदा आणि कृषी कायदा हे चार निर्णय अतिशय वाईट होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून गेली आहे. नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली आहे. कोरोनामुळे ती शिगेला पोहचली आहे, असं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रासोबत दुजाभाव

केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत दुजाभावाने वागत आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे पळवले जात आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मोदी गुजरातला गेले. विमान थोडं पुढं सरकवलं असतं तर कोकणची किनारपट्टी दिसली असती. हजार कोटी गुजरातला देणारे मोदी महाराष्ट्रबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. मोदींनी आपला विश्वास गमावला आहे, अशी टीका त्यांनी केली.

पाटलांचं मानसिक संतुलन बिघडलं

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. पाटलांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांनी तपासून घेण्याची गरज आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. आंतराराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर वाढल्याने दर वाढवावे लागतात असं पाटील सांगत आहेत. पाटलांचं हे वक्तव्य हस्यास्पद आहे. तसंच होतं तर मग काँग्रेसचं सरकार असताना इंधन दरवाढीविरोधात आंदोलन का करत होता? पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते स्मृती ईराणीपर्यंत सर्वच जण रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी स्मृती ईराणी, दिवंगत सुषमा स्वराज आणि दिवंगत अरुण जेटली यांची भाषणं काढून बघा. त्यांनी काय म्हटलं होतं ते कळेल. भाजपवाले आज उलट बोलत आहेत, याचंच आश्चर्य वाटतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

मग बघा दादा काय करतात

मी फाटक्या तोंडाचा आहे. तोंड उघडलं तर महागात पडेल, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला होता. त्यावरून सावंतांनी पाटलांची खिल्ली उडवली. तुम्हाला कोणी रोखलं आहे. बोलून दाखवाच. मग बघा दादा काय करतात ते, असंही सावंत म्हणाले. (arvind sawant attacks bjp over Modi government’s seventh anniversary)

 

संबंधित बातम्या:

कोरोनाशी लढण्यासाठी योग्य धोरण हवं, ‘निरर्थक बात’ नको; राहुल गांधींची टीका

गरीबांनी मरावं, श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा; नाना पटोलेंचा घणाघात

अजूनही नेहरुंच्याच पुण्याईवर देश चाललाय; संजय राऊतांचा भाजपला टोला

(arvind sawant attacks bjp over Modi government’s seventh anniversary)