Ashish Shelar: राज्यात गब्बरचे राज्य आहे काय?, नायरमधील प्रकरणावरून शेलारांचा संतप्त सवाल

| Updated on: Dec 04, 2021 | 5:29 PM

नायर रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे.

Ashish Shelar: राज्यात गब्बरचे राज्य आहे काय?, नायरमधील प्रकरणावरून शेलारांचा संतप्त सवाल
आशिष शेलार, आमदार, भाजप
Follow us on

मुंबई: नायर रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे एका बाळाचा मृत्यू झाला. त्यावरून प्रशासनाला जाब विचारायला जाणाऱ्या भाजपच्या नगरसेविकांशी असभ्य भाषेत बोललं जातं. त्यांना मारण्यासाठी गुंडांना बोलावलं जातं. ही अरेरावी कशासाठी? राज्यात काय गब्बरचं राज्य आहे का?, असा संत्त सवाल करतानाच महापालिकेत काल झालेल्या राड्याची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेवर शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनेनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी जातात. पण तिथे सुरक्षित नाही. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होणार नाहीत. मुंबईच्या महापौर घटनेनंतर 72 तासांनी रुग्णालयात पोहचल्या. 72 तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल शेलार यांनी केला.

जखमींवर पाऊण तास उपचारच नाही

या घटनेनंतर नायर रुग्णालयात पोहचलेल्या जखमी रुग्णांना जवळपास 45 मिनिटे तसेच ठेवले होते. त्यांच्यावर कोणतेही उपचार किंवा त्यांची विचारपूस केली गेली नाही. रुग्णालयाच्या याच हलगर्जीपणामुळे चार महिन्याचा बाळाचा मृत्यू झाला आणि त्याच्यामागे त्याच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला. या सगळा प्रकार टाळक फिरवणारा आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

जाधव यांच्या विधानाची चौकशी करा

मुंबई पालिकेच्या रुग्णालयात सुरू असलेला हा हलगर्जीपणा सर्वांसमोर आला आहे. त्याचा निषेध म्हणून आरोग्य समितीच्या भाजपा सदस्यांनी राजीनामा दिला. सभागृहात याबाबत जाब विचारला तर त्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सभागृहात असभ्य भाषा वापरली. गळा दाबून टाकू, गळा चिरुन टाकूपर्यंतची दमदाटी ते करु लागले. त्याबद्दल सवाल केला तर यशवंत जाधव यांनी भायखळ्यातील गुंड सभागृहाबाहेर बोलावले. त्यांनी भाजपा नगरसेविकांना धक्काबुक्की केली. मुंबईकरांनी निवडून दिलेल्या नगरसेविकांसोबत असे वागणार? गुंडाकडून धक्काबुक्की करणार? गब्बर सिंगचे राज्य आहे काय? असा खरमरीत सवाल त्यांनी केला. या सगळ्या घटनेचे चित्रण आमच्याकडे आहे त्यामुळे त्याची चौकशी करा. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी काही विधानं केली आहेत. त्यांच्या वक्तव्याची चौकशी करावी, आवश्यक असल्यास गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली. याचवेळी सत्ताधारी शिवसेनेने माहुल येथील 30 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घशात घातल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

बाळासाठी 45 मिनिटेही नाहीत?

याच परिसरात असलेल्या राणीच्या बागेतील पेंग्विनवर दिवसाला दीड लाख रुपये खर्च होतात. वर्षाला या पेंग्विनवर 15-16 कोटी रुपये खर्च कराल. पण बाळाला वाचवण्यासाठी 45 मिनिटात पोहोचणार नाही, हा प्रश्न विचारला तर झोंबतो. आम्ही झोंबणारे प्रश्न विचारतो म्हणून तुम्ही झोंबाझोंबी करणार. या हलगर्जीपणाविरोधात आम्ही हल्लाबोल करणारच, असा इशाराही त्यांनी दिला.

 

संबंधित बातम्या:

Ramnath Kovind : हेलिपॅडला विरोध, राष्ट्रपती कोविंद रोपवेने रायगडावर येणार! संभाजीराजेंचं ट्विट

Raigad video : पॅरासेलिंगवेळी 2 मैत्रिणींसोबत भयावह प्रकार, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Nashik| कंगनाचा राजसत्तेतील काही लोकांकडून उपयोग; कवी आणि अभिनेता किशोर कदमांचे परखड वक्तव्य