घराबाहेर पडण्यासाठीच रस्त्यावर उतरण्याचा बहाणा; शेलारांची खोचक टीका

| Updated on: Jan 17, 2021 | 2:14 PM

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढच्या आठवड्यात रस्त्यावर उतरणार आहेत. त्यावरून भाजपने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. (ashish shelar reaction on cm uddhav thackeray agitation against farm law)

घराबाहेर पडण्यासाठीच रस्त्यावर उतरण्याचा बहाणा; शेलारांची खोचक टीका
सरकार राणीच्या बागेत पेंग्विन पाहायला लोकांना आमंत्रण देते, पण शिवजयंतीसाठी एकत्र जमण्याला सरकार परवानगी देत नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले.
Follow us on

मुंबई: केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढच्या आठवड्यात रस्त्यावर उतरणार आहेत. त्यावरून भाजपने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाकाळात घराबाहेर पडले नव्हते. घराबाहेर पडता यावे म्हणूनच त्यांनी कृषी कायद्याचा बहाणा शोधला आहे. कृषी कायद्याच्या निमित्ताने बाहेर पडल्यावर लोक त्यांना बघायला येतीलच, अशी बोचरी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. (ashish shelar reaction on cm uddhav thackeray agitation against farm law)

केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचं गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला हवा देण्यासाठी आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढच्या आठवड्यात रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून भाजपने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री घराबाहेर पडले तर त्यानिमित्ताने लोक त्यांना बघायला तरी येतील. ते घराबाहेर पडल्यावर काही लोकांना नक्कीच आनंद होईल, असं सांगतानाच कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करावा. राज्याची नेमकी काय भूमिका आहे? शरद पवारांनीही अशा प्रकारच्या कायद्याबाबत काय भूमिका घेतली होती? हे जनतेसमोर त्यांनी मांडावं आणि मग भूमिका घ्यावी, असं आवाहन आशिष शेलार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलं. मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडण्यासाठी बहाणा शोधण्याचा प्रयत्न करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

ही तर दुर्बलांची सेना

नवी मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यावरही शेलार यांनी सडकून टीका केली. हिंमत असेल तर महाविकास आघाडीने नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत एकटं उतरावं. त्यांच्यात एकटं उतरण्याचं बळ नाही. ही दुर्बलांची सेना आहे. म्हणूनच हे दुर्बल लोक हातात हात घालून एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही कितीही काहीही केलं तर नवी मुंबईत महाविकास आघाडीचा विजय होऊच शकत नाही. नवी मुंबईत महापौर भाजपचाच बसेल, असा दावाही शेलार यांनी केला.

शिवसेनेचा काँग्रेससमोर दंडवत

सध्या दैनिक सामनाची जी भाषा आहे, त्यावरून शिवसेनेने काँग्रेससमोर दंडवत केल्याचं स्पष्ट दिसून येतंय. स्वत:चा अहंकार असतो तेव्हा उखाड देंगेची भाषा केली जाते. जेव्हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न येतो, संभाजी महाराजांचा प्रश्न येतो तेव्हा कोपऱ्यापासून दंडवत घातला जातो. यातून सत्तेसाठी भाषा बदलते आणि लाचारी कशी असते हेच शिवसेनेने दाखवून दिलं आहे, अशी टीका त्यांनी केली. (ashish shelar reaction on cm uddhav thackeray agitation against farm law)

खिशातले राजीनामे कुठे गेले?

संभाजीनगरच्या मुद्द्यावरूनही शेलार यांनी शिवसेनेला घेरले. औरंगाबादचं नामांतर करणारच असं आदित्य ठाकरे ठोकून का बोलत नाहीत? कराल तर तुमच्यासोबत नाही तर तुमच्याविना असं का बोललं जात नाही? आमच्यासोबत असताना खिशात राजीनामे घेऊन फिरत होता. आता हे राजीनामे कुठे गेले? असा सवाल करतानाच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर नाही केलं तर राजीनामे काढू, असं का बोललं जात नाही? असा सवालही त्यांनी केला. (ashish shelar reaction on cm uddhav thackeray agitation against farm law)

 

संबंधित बातम्या:

अहंकाराचा विषय येतो तेव्हा ‘उखाड दिया’; संभाजीनगरचा विषय येताच साष्टांग दंडवत; भाजपचा हल्लाबोल

औरंगाबादेत बॅनरवॉर, लव्ह औरंगाबाद बोर्डासमोर भाजपचे ‘नमस्ते संभाजीनगर’

“कंपाऊंडर डोक्यावर पडलेत का???” सामनातील मथळ्यावरुन संदीप देशपांडेंची खोचक टीका

Breaking | केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार

(ashish shelar reaction on cm uddhav thackeray agitation against farm law)