मनोज जरांगे यांची अक्कल काढताच अजय महाराज बारस्कर यांची पक्षातून हकालपट्टी; बच्चू कडू यांचा मोठा निर्णय

अजय महाराज बारस्कर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांची अक्कल काढली. त्यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे हे हेकेखोर आहेत. त्यांनी समाजाला आणि सरकारला वेठीस धरलं आहे, असं सांगतानाच जरांगे यांनी दोन बैठका बंद खोलीत घेतल्या, त्यात काय घडलं ते सांगावं, असं आव्हानच दिलं आहे. तर दुसरीकडे जरांगे यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने बारस्कर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

मनोज जरांगे यांची अक्कल काढताच अजय महाराज बारस्कर यांची पक्षातून हकालपट्टी; बच्चू कडू यांचा मोठा निर्णय
Ajay Maharaj Baraskar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 21, 2024 | 6:43 PM

अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 21 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणं अजय महाराज बारस्कर यांना चांगलंच भोवलं आहे. अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांना प्रहार जनशक्ती पक्षातून निलंबित करण्यात आले आहेत. पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ही कारवाई केली आहे. बारस्कर यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. पक्षाचा जरांगे यांना पाठिंबा असताना वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच बारस्कर यांच्या विधानाशी पक्ष सहमत नाही, पक्षाची ती अधिकृत भूमिका नसल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लू ऊर्फ महेंद्र जवंजाळ यांनी एक निवेदन काढून ही माहिती दिली आहे. अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत जी भूमिका मांडली त्याचं प्रहार जनशक्ती पक्ष समर्थन करत नाही. किंवा प्रहार वारकरी संघटनाही समर्थन करत नाही. किंवा आमचा या विधानाशी काहीच संबंध नाही. अजय महाराज बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पार्टी आणि प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांचा पक्षाशी आजपासून काहीच संबंध राहणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

नेत्यांना आदेश

दरम्यान, नेते आणि कार्यकर्त्यांसाठी बच्चू कडू यांनी नवा आदेशही दिला आहे. पक्षातील कोणत्याही व्यक्तीने मनोज जरांगे पाटील, मराठा नेते आणि मराठा आरक्षणावर भाष्य करू नये. भूमिका मांडू नये. तसं केल्यास त्या व्यक्तीला पक्षातून काढलं जाईल. त्याचा पक्षाशी काहीच संबंध राहणार नाही, अशी तंबीच बच्चू कडू यांनी दिली आहे. तसेच या पुढे मनोज जरांगे, मराठा आरक्षण आणि मराठा नेत्यांबाबत केवळ बच्चू कडूच भूमिका मांडतील, असंही या पक्षादेशात म्हटलं आहे.अजय महारा

काय म्हणाले होते बारस्कर?

अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. बारस्कर यांनी थेट जरांगे यांची अक्कलही काढली होती. जरांगेमुळे राज्यातील एक नेता मोठा होतोय. भुजबळ हे मोठे होत आहेत. मराठ्यांनी हे शोधावे की त्यांच्या मागे कोण आहे? जरांगे हे स्वत:ला देव समजू लागले आहेत. आमचा त्यांना विरोध आहे. जरांगे यांना कायदा माहीत नाही. त्यांना बोलता येत नाही. त्यांना आयुष्यभर आंदोलनच करायचं आहे. त्यांना मोठ्ठं व्हायचं आहे. केवळ प्रसिद्धी मिळवायची आहे, अशी टीका अजय महाराज बारस्कर यांनी केली आहे.

मनोज जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत आहे. त्यांना सरकारला वेठीस धरायचं आहे. जरांगे यांच्या मागे अदृश्यशक्तीचा हात आहे. त्यांच्या मागे भुजबळ असल्याचा संशय वाटतो. भुजबळ त्यांच्यामुळेच मोठे झालेत, असा दावा करतानाच वाशी आणि लोणावळ्यात बैठक झाली. या बैठकीला मी नव्हतो. बंद दाराआड झालेल्या बैठकीत काय झालं हे मला माहीत आहे, असा दावा त्यांनी केला होता. जरांगे वारंवार आपली मागणी बदलत आहे. माझ्या जीवाला धोका आहे. मला धमक्या येत आहेत. पोलिसांना विनंती आहे की त्यांनी मला सुरक्षा द्यावी, असं बारस्कर म्हणाले.