‘ते’ दु:ख डोक्यात खणतंय; वडिलांच्या आठवणी जागवताना बच्चू कडू भावूक

| Updated on: Jun 20, 2021 | 4:11 PM

गावातील कोणत्याही रुग्णाच्या मदतीला धावून जाणं हा बापूंचा सर्वात चांगला गुण होता. त्यांचा हा गुणच माझ्याकडे आला आहे, असं सांगतानाच आज मी चांगल्या पदावर आहे. (bacchu kadu)

ते दु:ख डोक्यात खणतंय; वडिलांच्या आठवणी जागवताना बच्चू कडू भावूक
बच्चू कडू
Follow us on

मुंबई: गावातील कोणत्याही रुग्णाच्या मदतीला धावून जाणं हा बापूंचा सर्वात चांगला गुण होता. त्यांचा हा गुणच माझ्याकडे आला आहे, असं सांगतानाच आज मी चांगल्या पदावर आहे. पण आज बापू नाहीत. त्याची नेहमी खंत असते. बापूंना या सगळ्या वैभवाचा आनंद घेता आला नाही. याचं दु:ख मात्र कायम डोक्यात खणत असतं, अशी भावूक प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. (bacchu kadu remember his father on father’s day)

‘फादर्स डे’ निमित्ताने बच्चू कडू यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून वडिलांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आम्ही वडिलांना बापू म्हणायचो. कारण त्यांचं नाव बाबाराव होतं. नाव घेतल्यासारखं वाटायचं म्हणून आम्ही त्यांना बापू म्हणायचो. बापूंच्या सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आमच्याकडे शेकडं होती. शंभर एकराचा कारभार होता. बैलजोड्या होत्या. सर्व गोष्टी काही काळ व्यवस्थित होत्या. गावात कोणीही आजारी पडलं आणि बापूकडे कोणी आलं तर ते शेकडं रुग्ण वाहिकेचं काम करत असत. म्हणजे कधी कधी तर एकीकडे घोडा आणि बैल असं सुद्धा शेकडंला जुंपताना आम्ही पाहिलं आहे. एक दोन महिन्यातून बापू शेकड्यानं पेशंट दवाखान्यात नेण्याचं काम करायचे. तोच त्यांचा गुण आणि आठवण आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

घोडा उधळला अन्…

यावेळी त्यांनी लहानपणीची एक आठवणही सांगितली. लहान असताना मी घोड्यावर बसलो होतो. पण घोडं जेव्हा बुजळलं तेव्हा ते गावात सैराट सारखं पळू लागलं. तेव्हा मी घोड्यावरच होतो. त्यात एक पोरगं पायाखाली आलं. त्याच्या कानाला लागलं. मी घाबरलो. मी वेगळ्याच मनस्थितीत होतो. बापू काय म्हणेल याची भिती होती. पण बापूने ते काहीच पाहिलं नाही. त्यांनी पहिलं म्हटलं, तू काय केलं ते जाऊ दे. आधी त्या पोराला उचल आणि दवाखान्यात ने. एवढं म्हटल्यावर मला प्रचंड आधार वाटला. मी केलेली चूक लपवली आणि लगेच त्या पोराचं काही वाईट होऊ नये म्हणून त्यांनी धावपळ करायला सांगितलं. लगेच आम्ही शेकडं काढलं. गावात फिरलो. डॉक्टरांकडे गेलो. नंतर चांदूकला गेलो. बापू सोबत होते. सर्व चांगलं झाल्यावर मग बापू मला रागावले. हा एक चांगूलपणा वडिलांचा पाहिला, अशी आठवणी त्यांनी सांगितली.

त्यांच्या प्रेमामुळेच चांगलं काम करतोय

आई आणि वडिलांच्या प्रेमामुळेच मला अतिशय चांगलं काम करता आलं. आज बापू नाहीत. पण मी चांगल्या पदावर आहे. त्याची नेहमी खंत असते. बापूंना या सगळ्या वैभवाचा आनंद घेता आला नाही. याचं दु:ख मात्र कायम डोक्यात खणत असतं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (bacchu kadu remember his father on father’s day)

 

संबंधित बातम्या:

प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

प्रताप सरनाईकांनी लेटर लिहून ‘लहान तोंडी मोठा घास’ घेतला आहे का?; वाचा 5 मोठे मुद्दे

प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला; भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिक्रिया काय?

(bacchu kadu remember his father on father’s day)