BIG BREAKING | भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. भगतसिंह कोश्यारी हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले आहेत.

BIG BREAKING | भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Chetan Patil | Updated on: May 20, 2023 | 7:00 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. भगतसिंह कोश्यारी हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी पाहता आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज पहिल्यांदाच भगतसिंह कोश्यारी आणि एकनाथ शिंदे यांची भेट होत आहे.

भगतसिंह कोश्यारी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध राजकीय नेत्यांची भेट घेतली आहे. पण एकनाथ शिंदे यांची भेट जास्त महत्त्वाची मानली जात आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर सविस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही. आपण कोर्टाच्या निकालावर फार काही भाष्य करु इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. त्यानंतर आज ते थेट एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

कोश्यारी आणि वाद

भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांचे महाविकास आघाडी सरकारसोबत खटके उडाल्याचं बघायला मिळालं होतं. याशिवाय त्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे ते वादात सापडले होते. महाविकास आघाडीने कोश्यारींना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन अनेकदा घेरण्याचा प्रयत्न केला होता.  कोश्यारींनी आपल्या वक्तव्यांवर माफी मागावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली होती.

भगतसिंह कोश्यारी VS उद्धव ठाकरे

भगतसिंह कोश्यारी आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन चांगलाच वाद बघायला मिळाला होता. या मुद्द्यावरुन दोन्ही बाजूने तिखट शब्दांत पत्रव्यवहार करण्यात आला होता. पण तरीही राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्द्यावर मार्ग निघाला नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोश्यारी यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. पण महाविकास आघाडीने आक्षेप घेतल्यानंतर संबंधित प्रकरण हे न्यायप्रविष्ट प्रलंबित आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यपालांनी बोलावली बहुमत चाचणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंड पुकारल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल बहुमत चाचणीचे आदेश दिले होते. पण उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरं न जाता राजीनामा दिला होता.
Follow Us