सर्वात मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंना कोर्टाचे समन्स; काय आहे प्रकरण?

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एका जुन्या प्रकरणात समन्स बजावण्यात आलं आहे. कल्याण कोर्टाने ठाकरेंना समन्स बजावत येत्या 5 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वात मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंना कोर्टाचे समन्स; काय आहे प्रकरण?
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 30, 2026 | 10:45 AM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने समन्स बजावले आहे. वसंत डावखरे प्रकरणात कोर्टाने उद्धव ठाकरे यांना समन्स बजावले असून त्यांना 5 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोर्टात हजर राहणार की वकिला मार्फत आपलं म्हणणं मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वसंत डावखरे यांनी याप्रकरणी कोर्टात दाद मागितली होती. डावखरे आता हयात नाहीत. त्यामुळे या प्रकरणात कोर्टात काय होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांना 22 एप्रिल 2009च्या लोकसभा निवडणुकीतील कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरणी कल्याण कोर्टाने नोटीस बजावली आहे. 2009मध्ये वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे अशी निवडणूक होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते. या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद पराजंपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर वसंत डावखरे यांनी खटला दाखल केला होता. त्यामुळे कोर्टाने ठाकरेंना समन्स बजावले आहे.

डावखरेंनी व्हिडीओ नाकारला होता

तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील सभेत हा व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला होता. मात्र वसंत डावखरेंनी व्हिडिओतील वक्तव्य नाकारले होते. हा व्हिडीओ मॉर्फ केल्याचा डावखरे यांचा दावा होता. व्हिडिओतील मजकूर निवडकपणे एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरल्याचा डावखरेंचा आरोप होता. शिवसेनेने हा व्हिडिओ डावखरेंचाच असल्याचा दावा करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे डावखरे यांनी थेट कोर्टात जाऊन या प्रकरणात दाद मागितली होती. आता परत या प्रकरणी कोर्टाने उद्धव ठाकरे यांना समन्स बजावल्याने उद्धव ठाकरे काय बाजू मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढे काय होणार?

दरम्यान, वसंत डावखरे या प्रकरणात मुख्य तक्रारदार होते. ते आता हयात नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचे पुढे काय होणार? आणि उद्धव ठाकरे काय बाजू मांडणार हे 5 ऑगस्ट रोजीच स्पष्ट होणार आहे. मात्र, या प्रकरणी डावखरे कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. डावखरे कुटुंबीयांच्या भूमिकेवरही हे प्रकरण अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us