VIDEO: एसटी कामगारांच्या संपात का गेले नाही?; वाचा, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

| Updated on: Nov 29, 2021 | 3:01 PM

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे 16 दिवस आझाद मैदानात मुक्काम ठोकून होते. एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद करत होते.

VIDEO: एसटी कामगारांच्या संपात का गेले नाही?; वाचा, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते.
Follow us on

मुंबई: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे 16 दिवस आझाद मैदानात मुक्काम ठोकून होते. एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद करत होते. मात्र या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकदाही आझाद मैदानात न गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यावर खुद्द फडणवीस यांनीच उत्तर दिलं आहे. मी आंदोलनाच्या ठिकाणी गेलो नाही. पण कामगारांच्यासोबतच होतो. मी कामगारांशी चर्चाही केली आणि सरकारशी बोलून संपावर तोडगा काढण्यासाठी अनेक पर्यायही दिले, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांनी आज टीव्ही9 मराठीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. आमचे दोन आमदार तिथे होते. एसटीचे लोक मला स्वत: येऊन भेटले. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचा प्रश्न मी सातत्याने मांडला. त्यामुळे तिथे गेलेच पाहिजे असं काही नाही. मी त्यांच्यासोबत होतो. त्यांच्या प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून सरकारशीही सातत्याने बोलत होतो, असं फडणवीस यांनी सांगितलं.

आम्ही समंजसपणाची भूमिका घेतली

आमच्या आमदारांनी समंजसपणाची भूमिका दाखवली. संप मोडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आमच्या आमदारांनी संघर्ष केला. 16 दिवस आमचे आमदार आझाद मैदानात झोपले होते. कामगारांसोबत होते. त्यानंतर सरकार दोन पावलं पुढे आलं. तेव्हा आमच्या आमदारांनी सामंजस्याची भूमिका घेतली. सरकार पगार वाढ करत आहे. पण विलीनीकरणाचा प्रश्न सोडायचा नाही. मात्र अनंतकाळ एसटीही बंद ठेवता येत नाही. कर्मचारी महत्त्वाचे आहेत. तसेच लोकही महत्त्वाचे आहेत. लोकांची गैरसोय होतेय, याचा आमच्या लोकांनी विचार केला. पगारवाढीनंतर आमच्या लोकांनी माघार घेतली. पण विलीनीकरणाला आमचा पाठिंबा आहे, हेही माघार घेताना सांगितलं. आम्ही सामंजस्याने भूमिका घेतल्यानंतर सत्तारुढ पक्ष त्यावर टीका करतो. आम्ही प्रगल्भता दाखवूनही सत्ता पक्ष अप्रगल्भ वागला नाही, अशी टीका त्यांनी केली.

कधी कधी वाटतं विरोधाला विरोध बरा

भाजपने संपात विलीनीकरणाचा मुद्दा आणून सरकारला वेठीस धरल्याचा आरोप त्यांनी खोडून काढला. भाजपचे नेते संपात कधी आले… संप विलीनीकरणावरच सुरू झाला होता. संप सुरू झाल्यानंतर आम्ही 8 दिवसानंतर संपात आलो, असं सांगतानाच आम्ही या संप काळात प्रगल्भपणे वागलो. पण या सरकारला प्रगल्भ विरोधी पक्षही नकोय. त्यामुळे कधी कधी वाटतं विरोधाला विरोध केलेला बरं. आम्ही विलीनीकरणावर मार्गही सांगितला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्या म्हणून सांगितलं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Pankaja Munde | विडा रंगला ओठी, पंकजा मुंडेंनी टपरीवर उभं राहून स्वतःसाठी बनवलं खास पान!

संकटातले संधीसाधू! सरकारनं कोरोना काळात फक्त खजाने भरले, महाविकास आघाडीवर विरोध पक्ष नेते फडणवीसांचा आरोप

लॉकडाऊनची परिस्थिती नाही, निर्बंधाबाबत सरकारनं आम्हाला विचारात घ्यावं, फडणवीसांचं आवाहन