कामाशिवाय घराबाहेर पडू नका रे… अलर्ट आला; हेल्पलाईन नंबरही जारी; पावसाने भरवली धडकी
कल्याण-डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. ठाण्याला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी झाल्याने, केडीएमसी प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि आपत्कालीन मदतीसाठी जाहीर केलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपत्कालीन व्यवस्थापन 24 तास सज्ज आहे.

राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातही पावसाने दाणादाण उडवली आहे. कल्याण-डोंबिवलीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. ठाणे जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, आपत्ती व्यवस्थापनासाठी पालिकेची यंत्रणा 24 तास सज्ज ठेवण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देत पूरप्रवण आणि सखल भागांवरील परिस्थितीचा आढावा घेतला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी म्हटलं आहे.
या नंबरवर संपर्क साधा
पावसामुळे केडीएमसी हाय अलर्टवर आहे. महापौर आणि आयुक्तांकडून कमांड कंट्रोल सेंटरमधून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच सखल आणि पूरप्रवण भागांवर विशेष नजर ठेवण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे. तसेच आपत्कालीन मदतीसाठी 0251-2211866 आणि 1800-233-0045 या टोल-फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे.
ठाण्यात जाम…
दरम्यान, ठाण्यालाही पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. सकाळपासून पडणाऱ्या पावसाचा ठाण्यातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ठाण्यातील इस्टर्न एक्सपर्स वेवर वाहतूक संथ गतीने धावत आहे. शिवाय मुसळधार पावसामुळे वाहनांची दृश्यमानता कमी होत असल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे.
काल रेड अलर्ट, आज ऑरेंज
तर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात रात्री पावसाने विश्रांती घेतली, पण सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. काल दिवसभरात कोकणात अनेक ठिकाणी पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसाने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. जिल्ह्यातील मुख्य नदी असलेली काजळी नदी सुद्धा दुथडी भरून वाहू लागली आहे. किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. जून महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात केवळ 28 टक्के पाऊस झाला होता.
