
मुंबईत काल महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिळून एकूण 118 जागा जिंकल्या आहेत. ठाकरे बंधुंनी 72 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस 24 आणि इतरांनी 13 जागांवर विजय मिळवला. भाजपने 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला.शिंदे शिवसेनेने 29 जागा जिंकल्या.उद्धव ठाकरे शिवसेना 66 आणि मनसेने 6 जागा जिंकल्या. पण सत्तेपासून ते लांबच आहेत.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला राज्यात 30 जागांवर विजय मिळाला असला तरी मुंबईत काँग्रेसबरोबर आघाडीत 41 जागा लढवूनही एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. धक्कादायक म्हणजे मुंबईत 8 आंबेडकरी विचारांचे पक्ष महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र यातील एकाही पक्षाला यावेळी एकही जागा जिंकता आली नाही.
रामदास आठवले यांच्या रिपाईने किती जागा जिंकल्या?
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाईने 11, अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने 45, मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने 78, आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने 5, प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने 2, चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद पार्टीने 16, डॉ. सुरेश माने यांच्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने 5 आणि रिपाइं – खोरीप गटाने एक अशा 164 जागा लढविल्या होत्या.
अनुसूचित जात प्रवर्गासाठी 15 मतदारसंघ आरक्षित
आठवले यांच्या रिपाइंने स्वबळावर उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. तर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने काँग्रेस आघाडीत सर्व जागा लढवल्या होत्या. प्रा. जागेंद्र कवाडे यांची पीआरपी ही शिवसेना-शिंदे गटाबरोबर होती. मात्र यापैकी एकाही पक्षाला मुंबईत एकही जागा जिंकता आली नाही. मुंबईत अनुसूचित जात प्रवर्गासाठी 15 मतदारसंघ आरक्षित आहेत. या सर्व 15 मतदारसंघामध्ये बड्या पक्षांनी बाजी मारली आहे.