मुंबईकरांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याचा निर्णय रद्द

| Updated on: Apr 16, 2020 | 8:52 AM

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या डोसमुळे कार्डिअॅक धोका उत्पन्न होण्याकडे काही तज्ज्ञ मंडळींनी लक्ष वेधलं होतं, त्यानंतर मुंबई महापालिकेने या निर्णयावर पुनर्विचार केला (BMC cancelled paln to give Hydroxychloroquine tablets in Mumbai)

मुंबईकरांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याचा निर्णय रद्द
Follow us on

मुंबई : मुंबईकरांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याबाबत घेतलेला निर्णय मुंबई महापालिकेने रद्द केला आहे. हृदयासंबंधीच्या धोक्याचे कारण सांगत बीएमसीने हा निर्णय मागे घेतला आहे. कोरोना विषाणूंचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कालच हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. (BMC cancelled paln to give Hydroxychloroquine tablets in Mumbai)

सरसकट लाखभर नागरिकांना हा डोस देण्याऐवजी आता फक्त काहीशे जणांनाच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या दिल्या जाणार आहेत. ‘कोरोना’ची लागण न झालेल्या मात्र क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती, पोलिस आणि आरोग्य कर्मचारी यांनाच हा डोस दिला जाणार आहे. धारावीतील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ‘हाय रिस्क’ व्यक्तींनाही हा डोस दिला जाणार आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या मलेरियाच्या उपचारासाठी वापरल्या जातात. सध्या ‘कोरोना’ची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना हा डोस दिला जातो. मात्र हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या डोसमुळे कार्डिअॅक धोका उत्पन्न होण्याकडे काही तज्ज्ञ मंडळींनी लक्ष वेधलं होतं.

हेही वाचा : हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आम्हालाही द्या, पाकिस्तानची भारतापुढे याचना

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा डोस देण्यासंबंधी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल माहिती दिली होती. वरळी आणि धारावी या ‘कोरोना हॉटस्पॉट’ असलेल्या परिसरातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महापालिका हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देणार होती. वय वर्ष 18 ते 55 वयोगटातील निरोगी नगारिकांना हा डोस दिला जाणार असल्याचं महापौर म्हणाल्या होत्या, परंतु आता हा निर्णय रद्द झाला आहे. (BMC cancelled paln to give Hydroxychloroquine tablets in Mumbai)

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन काय आहे?

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मूळ मलेरियावरील औषध आहे. मलेरियाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी या गोळया दिल्या जातात. पण सध्या कोरोना व्हायरसवरील उपचारात हे औषध अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यामुळे जगभरातून या गोळ्यांची मागणी वाढली आहे.

भारत हा हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा सर्वात मोठा उत्पादक आहे. जगात या औषधांच्या उत्पादनात भारताचा 70 टक्के वाटा आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारात हे औषध परिणामकारक ठरत आहे.

देशाची दरमहा 40 टन हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) उत्पादन करण्याची क्षमता आहे. हे 200-200 मिलीग्रामच्या 200 दशलक्ष टॅब्लेटच्या बरोबरीचे आहे. हे औषध ‘रुमेटाइड आर्थराइटिस’सारख्या ‘ऑटो इम्यून’ रोगाच्या उपचारात देखील वापरले जाते, त्यामुळे देशात याची उत्पादन क्षमता चांगली आहे.

मागच्या महिन्यात भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. भारतात उपचारासाठी औषधसाठा शिल्लक राहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. ‘कोरोना’बाधित अमेरिकेसह शेजारी देशांना माणुसकीच्या नात्याने पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवणार असल्याचं भारताने आता सांगितलं आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक देशांना तातडीने या औषधांची गरज आहे.

(BMC cancelled paln to give Hydroxychloroquine tablets in Mumbai)