Varavara Rao Bail | तेलुगू कवी वरवरा राव यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर

| Updated on: Feb 22, 2021 | 12:10 PM

मुंबई हायकोर्टानं नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा आरोप असणारे प्रसिद्ध तेलुगू कवी वरवरा राव 6 महिन्यासाठी जामीन मंजूर केला आहे. ( Varavara Rao Mumbai High Court)

Varavara Rao Bail | तेलुगू कवी वरवरा राव यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर
वरवरा राव यांना जामीन मंजूर
Follow us on

मुंबई : नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा आरोप असणारे प्रसिद्ध तेलुगू कवी वरवरा राव (Varavara Rao) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. वरवरा राव यांना 6 महिन्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना एनआयए कोर्ट विभाग सोडून नये, असं म्हटलं आहे. राव यांना त्यांचा पत्ता आणि फोन नंबर एनआयएला कळवावा लागणार आहे. कोर्टाच्या तारखांना हजर राहावे, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. तर, सहा महिने संपल्यानंतर सरेंडर करण्याचे आदेश नायालयानं दिले आहेत. ( Bombay High Court Grants Varavara Rao Bail For 6 Months On Medical Grounds In Bhima Koregaon Case)

मुंबई हायकोर्टानं वरवरा राव यांना 6 महिन्यासाठी जामीन मंजूर केला आहे. राव यांनी इतर आरोपींच्या संपर्कात राहू नये, साक्षीदारांवर दबाव आणू नये, अशा सूचना न्यायालयानं दिल्या आहेत. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये आणि 6 महिन्यानंतर त्यांनी सरेंडर व्हावं किंवा जामिनासाठी पुन्हा अर्ज करावा, असे निर्देश न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटळे यांच्या बेंचने दिले.

पासपोर्ट जमा करण्याच्या सूचना

वरवरा राव यांना मुंबई हायकोर्टानं त्यांचा त्यांचा पासपोर्ट एनआयए कडे जमा करावा, अशा सूचना दिल्या आहेत.वरावरा राव यांनी आजारपणाच्या कारणास्तव जामीन द्यावा म्हणून अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं निकाल दिला आहे. वरावरा राव यांना एल्गार परिषद प्रकरणात अटक झाली आहे. गेल्या दीड वर्षा पासून ते जेल मध्ये आहेत. ते 81 वर्षाचे असून त्यांना अनेक गंभीर आजार आहेत. त्यांचं आजारपण लक्षात घेता त्यांना योग्य आणि चांगले उपचार देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेला कारणीभूत असल्याचा आरोप

नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथील हिंसाचारास कारणीभूत ठरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नक्षल संबंधांवरुन 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी देशभरातील विविध ठिकाणांहून कवी वरावर राव, गौतम नवलखा आणि या तीन जणांना अटक केली होती. भीमा कोरेगाव दंगल आणि त्यापूर्वी आयोजित एल्गार परिषदेशी यांचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

वरवरा राव कोण आहेत? (Who is Varavara Rao)

वरवरा राव हे प्रसिद्ध तेलुगू कवी आहेत. त्यांचा जन्म वारांगाळ जिल्ह्यात झाला आहे. वयाच्या 17 व्या वर्षापासून त्यांनी कवितांचे लेखन करण्या सुरुवात केली. हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी तेलुगू साहित्यातमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. राव यांच्यावर मार्क्सवादी तत्वज्ञानाचा प्रभाव राहिला असून त्यांनी प्राध्यापक म्हणून देखील काम केले आहे. राव यांनी 15 कवितासंग्रहांचं लेखन केले आहे. आंध्रप्रदेशातील विविध सामाजिक आंदोलंनामध्ये त्यांचा सहभाग राहिला असून विविध प्रकरणांमध्ये आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांना यापूर्वी देखील अटक केली होती.


संबंधित बातम्या:

मोठी बातमी: उच्च न्यायालयाकडून वरवरा राव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी

भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा आयएसआयच्या संपर्कात; NIAचा आरोपपत्रात दावा


( Bombay High Court Grants Varavara Rao Bail For 6 Months On Medical Grounds In Bhima Koregaon Case)