मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे दादरवरुन कल्याणकडे जाणारी वाहतूक जवळपास पाऊणतास उशिरा धावत आहे. दादरच्या फलाट क्रमांक 1 वर रुळावर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल थांबवण्यात आल्या. एकामागे एक रांगेत लोकल उभ्या राहिल्या. नेमकं काय झालंय हे प्रवाशांना समजत नव्हतं.
लोकल बिघाडामुळे दुपारच्या सत्रात अनेक लोक त्रस्त आहेत. लोकल तब्बल 40 ते 45 मिनिटे रखडल्या. लोकल एकाच जागी पाऊणतास रखडल्याने अनेकांनी लोकलमधून उतरत, रुळावरुन चालत मार्गस्थ होणं पसंत केलं.
ऑफिस सुटण्याची वेळ आहे. त्यामुळे चाकरमानी घरी परतण्यावेळीच लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार हे निश्चित आहे. कारण 40 ते 45 मिनिटे उशिरा धावत असलेल्या लोकलचा ताण, वाहतूक सुरळीत झाल्यानंतरही काही वेळ राहतो.