
मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज सकाळी बदलापूरहून मुंबईकडे येणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऐन सकाळी कामावर जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. यामुळे लोकल गाड्या तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास बदलापूर स्थानकाच्या आसपास तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक कोलमडली आहे. या तांत्रिक अडचणीमुळे अप मार्गावरील मुंबईकडे जाणारी लोकल वाहतुकीचे तीन तेरा वाजले. सकाळी ७ ते ९ या गर्दीच्या वेळेतच हा बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. यामुळे बदलापूरहून मुंबई, ठाणे, कल्याणकडे जाणाऱ्या अनेक गाड्या जागच्या जागी थांबल्याचे पाहायला मिळाले. तसेच काही गाड्या या अतिशय धीम्या गतीने धावत असल्याची माहिती समोर येत आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे यांसह विविध रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी झुंबड उडाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने विविध स्थानकात चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रोजच्या वेळेनुसार स्टेशनवर आलेल्या प्रवाशांना लोकल वेळेवर मिळत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याची चिंता आणि लोकलच्या वारंवार होणाऱ्या विलंबाचा संताप प्रवाशांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलवर अवलंबून असलेल्या नोकरदारांना या विस्कळीत सेवेचा मोठा फटका बसला. ३० मिनिटांहून अधिक विलंबाने लोकल सुरू झाल्याने अनेकांना ऑफिसला पोहोचायला उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. ही समस्या दररोजची असल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर सोशल मीडियावरून टीका केली आहे. दररोज हाच खोळंबा, रेल्वे कधी सुधारणार? असा सवाल संतप्त प्रवाशांकडून केला जात आहे. लोकल उशिरा सुरु असल्याने अनेक प्रवाशांचे वेळापत्रकच नाही, तर संपूर्ण दिवसाचे नियोजन कोलमडले आहे.
दरम्यान हा बिघाड लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरात लवकर लोकल सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र पुढील काही तास मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील लोकल सेवा उशिरानेच धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.