मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या; छत्रपती संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: May 08, 2021 | 11:48 AM

आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. | Chhatrapati Sambhaji Raje maratha reservation

मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या; छत्रपती संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ठाकरे सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी याबद्दलचा निर्णय आता केंद्र सरकारच घेऊ शकते, असे सांगितले असले तरी मराठा समाजाचा (Maratha community) सध्याचा रोष शमवण्यासाठी काय करता येऊ शकेल, यासाठी राज्य सरकार पर्याय शोधत आहे. (Chhatrapati Sambhaji Raje wrote letter to CM Uddhav Thackeray about maratha reservation)

या पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. या पत्रात संभाजीराजे यांनी शासकीय भरती प्रक्रियेत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मराठा आरक्षणासाठी नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना?; राज्य सरकारच्या हालचाली सुरू

छत्रपती संभाजीराजेंनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

महाराष्ट्र विधिमंडळाने पारीत केलेल्या व मुंबई उच्च न्यायालयाने कायम केलेल्या मराठा आरक्षण कायद्यांतर्गत २०१८ सालापासून मराठा समाजातील अनेक उमेदवार विविध शासकीय भरती प्रक्रियांमध्ये नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र शासनाने मागविलेल्या एका अहवालानुसार असे २१८५ मराठा उमेदवार असून, त्यांना अद्याप नियुक्तीपत्र देणे बाकी आहे. प्रथमतः कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ताळेबंदी व नंतर मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. ९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षण अंमलबजावणीस दिलेली स्थगिती, या कारणांमुळे शासनाकडून या उमेदवारांस सर्व प्रक्रिया पूर्ण असूनही नियुक्तीपत्र देण्यास विलंब झाला.

सध्या मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण कायदा रद्द करताना हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता, दि. ९ सप्टेंबर २०२० पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीस संरक्षण दिले आहे ; त्यामुळे शासनाने अतिविलंब न करता या सर्व उमेदवारांना, ते ज्या पदासाठी पात्र ठरले आहेत, त्याच पदाची नियुक्तीपत्रे देऊन त्वरीत शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

तसेच, दि. ९ सप्टेंबर २०२० पूर्वी व नंतर सुरू झालेल्या व अद्याप पूर्ण न झालेल्या शासकीय भरती प्रक्रियांमध्ये सहभागी झालेल्या मराठा उमेदवारांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. ४ जानेवारी २०२१ रोजी काढलेले प्रसिद्धीपत्रक ( एमआयएस-०६१८/सीआर-६१/२०१८/तीन ) मधील कलम ३ मधील उपकलमांमुळे प्रवर्ग निवडण्याबाबत संभ्रम होता. यामुळे सदर प्रक्रियेत ज्या मराठा विद्यार्थ्यांनी एस.ई.बी.सी. व ओपन प्रवर्ग निवडला आहे, अशा सर्व मराठा विद्यार्थ्यांना ई.डब्लू.एस. प्रवर्ग निवडण्याचा पर्याय तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. वरील सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून, कोणताही निर्णय अधांतरी न ठेवता, कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजास न्याय देण्याची ठोस भूमिका शासनाने ठेवावी.

कळावे.
आपला,
( संभाजी छत्रपती )

Chhatrapati Sambhaji Raje wrote letter to CM Uddhav Thackeray about maratha reservation)