शिष्टमंडळ आलं आणि गेलं… तोडगा नाहीच?, खोतकर यांच्या हाती बंद लिफाफा; जरांगे पाटील काय निर्णय घेणार?

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 12 वा दिवस आहे. काल त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. पण त्या चर्चेतून काही ठोस तोडगा निघाला नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिष्टमंडळ आलं आणि गेलं... तोडगा नाहीच?, खोतकर यांच्या हाती बंद लिफाफा; जरांगे पाटील काय निर्णय घेणार?
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 09, 2023 | 6:51 AM

मुंबई | 9 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं एक शिष्टमंडळ काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलं. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. कुणबी प्रमाणपत्रावरही चर्चा करण्यात आली. पण या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नसल्याचं सांगितलं जात आहे. शिष्टमंडळ आलं आणि गेलं. पण तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या हाती एक बंद लिफाफा दिला आहे. त्या लिफाफ्यात काय आहे? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी 11 जणांचं शिष्टमंडळ मुंबईला पाठवलं होतं. या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अडीच तास चर्चा केली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, माजी आमदार अर्जुन खोतकर, आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. या बैठकीत काही मुद्द्यांवर एकमत झालं. पण ठोस तोडगा निघाला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

चर्चा सकारात्मक

मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. तज्ज्ञ व्यक्तींशीही चर्चा करण्यात आली. चर्चा सकारात्मक झाली. या चर्चेतील तपशील जरांगे पाटील यांना सांगितला जाईल. अंतिम निर्णय जरांगे पाटीलयांचाच असेल, असं अर्जुन खोतकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा कानावर हात

मनोज जरंगे पाटील यांच्या शिष्टमंडळासह चर्चा सकारात्मक झाली आहे. त्यांचं शिष्टमंडळ त्यांना समजावतील. त्यामुळे जरांगे पाटील उपोषण मागे घेतील अशी अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी नवीन जीआर काढणार का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी कानावर हात ठेवला. मुख्यमंत्र्यांनी नव्या जीआरच्या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला.

जरांगे पाटील काय निर्णय घेणार?

दरम्यान, जीआरच्या दुरुस्तीवर कालच्या बैठकीत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीये. त्यामुळे आता जरांगे पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जरांगे पाटील हे आता उपोषण अधिक कडक करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us