‘…तेव्हा खुटा अधिक बळकट होतो’, मुख्यमंत्री सभागृहात नेमकं काय बोलून गेले?

"हे (ठाकरे गट) यूज आणि थ्रो कधी करतील कुणालाही कळणार नाही, म्हणून खेकड्याचा विषय काढला. रोकडे बंद झाले की खेकडे दिसायला लागले. त्यामुळे खेकड्याची वृत्ती कुणाची आहे ते सगळ्यांना माहिती आहे", असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

...तेव्हा खुटा अधिक बळकट होतो, मुख्यमंत्री सभागृहात नेमकं काय बोलून गेले?
| Updated on: Aug 04, 2023 | 8:55 PM

मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “हा आमच्या संपर्कात आहे, तो माझ्या संपर्कात आहे, अरे सगळे संपर्कात असते तर ही वेळ आली असती का? आम्हाला प्रेम पाहिजे असतं. मुख्यमंत्रीपद महत्त्वाचं नाही. प्रेमाचे दोन शब्द महत्त्वाचं असतं”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी टीका केली.

“आम्ही काम करणारे लोक आहोत. त्यादिवशी इर्शाळवाडीत घटना घडली मी तिकडे गेलो, अजित पवार वॉर रुममध्ये होते. देवेंद्र फडणवीस सभागृहात होते. आम्ही एक-दुसऱ्याच्या संपर्कात होतो. तिथे गेल्यानंतर यंत्रणा वाढते. ताबडतोब सर्वांना मदत मिळते. आपले एनडीआरएफ आणि इतर टीमला मॉरल सपोर्ट मिळतो. तेवढी हिंमतपण लागते. डोंगर चढायला. काही लोकं येतात, जायचं म्हणून ठिक आहे. नाना पटोले चढून आले”, अंस एकनाथ शिंदे म्हणाले.

“काही लोकं आले-गेले, मग थोडी टीका केली. व्हॅनिटी व्हॅन घेऊन गेले. पर्यटन करुन गेले. ठिक आहे, त्यावर मला बोलायचं नाही. टीका करायची नाही. मी मागे म्हटलं होतं. टीका करताना देखील सांभाळून करा. मला त्या भाषेत जायचं नाहीय”, असं शिंदे म्हणाले.

“हे (ठाकरे गट) यूज आणि थ्रो कधी करतील कुणालाही कळणार नाही, म्हणून खेकड्याचा विषय काढला. रोकडे बंद झाले की खेकडे दिसायला लागले. त्यामुळे खेकड्याची वृत्ती कुणाची आहे ते सगळ्यांना माहिती आहे. कुणी कुणाचे पाय खेचले यांचे नावे मी घेत नाही. नारायण राणे असतील, राज ठाकरे असतील, छगन भुजबळ असतील, मी थोडी मेहनत करायला गेलो, मनोहर जोशींना तर स्टेजवरुन वरुन खाली उतरवून पाठवलं. विजय वडेट्टीवारही मूळ शिवसैनिक आहेत”, असं एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले.

‘तेव्हा त्याचा खुटा अधिक बळकट होतो’

“काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे देखील ज्योतिष बघायला लागले. बोलले, मुख्यमंत्री जाणार आणि नवा मुख्यमंत्री येणार. मी म्हटलं, अरे माझ्याच जिल्ह्याच्या माणसाला माझा काय त्रास झालाय? एका जिल्ह्यातला माणूस. ते माझे हितचिंतक आहे. खरंतर दिल्ली म्हणजे आपले संबंध चांगले आहेत. आम्ही सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलो होते. मोदी यांनीदेखील चांगलं ट्विट केलं. जेव्हा आपण सांगतो ना की, जाणार जाणार, तेव्हा त्याचा खुटा अधिक बळकट होऊन जातो”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.