संकटाचा सामना करायला सरकार तयार, पण नागरिकांचीही वैयक्तिक जबाबदारी : उद्धव ठाकरे

| Updated on: Feb 23, 2021 | 11:13 PM

वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज (23 फेब्रुवारी) सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली.

संकटाचा सामना करायला सरकार तयार, पण नागरिकांचीही वैयक्तिक जबाबदारी : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज (23 फेब्रुवारी) सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या (CM Uddhav Thackeray appeal citizens to follow all rules amid Corona).

राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे बैठकीत आढावा घेतला. तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.”

‘मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करत होती, आताही ती आपली जबाबदारी’

“सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती. आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

‘संकटाचा सामना करायला सरकार तयार, पण नागरिकांचीही वैयक्तिक जबाबदारी’

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे सांगितलं. हे याचसाठी सांगितलं कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहेच, पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे.”

हेही वाचा :

यंत्रणा अ‍ॅलर्ट! संजय राठोड कोणत्याही क्षणी पोहरादेवीत; पारंपारिक वाद्य वाजवून होणार स्वागत

पालिका निवडणुकीत महाविकासआघाडी होणार की नाही? काँग्रेसने राष्ट्रवादी-शिवसेनेला धडकी भरवली

नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

व्हिडीओ पाहा :

CM Uddhav Thackeray appeal citizens to follow all rules amid Corona