धोकादायक इमारतीतील नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
हवामान विभागाने पुढील 4 ते 5 दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता प्रशासनाने धोकादायक इमारत पालिकेची असो की म्हाडाची नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून स्थलांतरीत करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत.

मुंबई : हवामान विभागाने पुढील 4 ते 5 दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता प्रशासनाने धोकादायक इमारत पालिकेची असो की म्हाडाची नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून स्थलांतरीत करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. “मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरीत्या घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी. समन्वयाने काम करावे,” असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले. आज (18 जुलै) त्यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील सूचना केल्या.
“उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या, खबरदारी घ्या”
उद्धव ठाकरे म्हणाले, “दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या. आज चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीच्या वरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर मलबा पसरून प्राणहानी झाली. ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी देखील मलबार हिल येथे टेकडीचा भाग अचानक खचला होता. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत. त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून खबरदार राहण्यास सांगावे. काही ठिकाणी भूमिगत वाहनतळामध्ये पाणी घुसले व वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच भांडूप येथे जल शुद्धीकरण केंद्रच बंद पडल्याची घटना घडली. हे पाहता अधिक सावधगिरी बाळगावी.”
मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.#MumbaiRains
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2021
“धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढा”
“पावसाचा जोर रात्री वाढतो आहे हे 9 जून आणि आत्ता काल (17 जुलै) झालेल्या पावसाने लक्षात आले आहे. हे पाहता रात्री देखील पाणी उपसा करणारी यंत्रणा कर्मचारी काम करीत राहतील हे पाहावे. पाउस थांबल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारती अधिक कमकुवत होऊन त्यांचा काही भाग पडून मोठी दुर्घटना घडते. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारती मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून स्थलांतरित करा,” असे आदेश उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.
“सातत्याने संपर्कात राहा, पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहा”
“सर्वच यंत्रणांनी बचाव पथके तयार ठेवावीत व आपापल्या नियंत्रण कक्षांना एकमेकांशी सातत्यने संपर्कात राहण्यास सांगावे. कोविड केंद्र व फिल्ड रुग्णालयांतील डॉक्टर्स व वैद्यकीय पथकांना देखील मदतीसाठी तयार ठेवावे. अर्धवट बांधकामे, मेट्रोची व इतर कामे यामधून भरपूर पाऊस झाल्यास पाणी साचून दुर्घटना होऊ नये. तसेच त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेले राहून मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसारखे रोग पसरवू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहावे,” असंही मुख्यमंत्री ठाकरेंनी नमूद केलं.