AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धारावीत पसरतोय जीवघेणा आजार, लक्षणं काय? आकडेवारी काय सांगते? वाचा A टू Z माहिती…

धारावीत पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षणानुसार मृत्यूंची संख्या २२५% ने वाढली आहे. गटार, प्रदूषित पाणी आणि अस्वच्छता यामुळे हा आजार पसरतो.

धारावीत पसरतोय जीवघेणा आजार, लक्षणं काय? आकडेवारी काय सांगते? वाचा A टू Z माहिती...
dharavi slums
| Updated on: Jun 18, 2025 | 1:25 PM
Share

धारावीमध्ये औषधांना ही न जुमानणारा क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू आणि अतिसार हे आजार सामान्यतः मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे सर्वश्रुत आहे. मात्र प्रत्येक पावसाळ्यात विशेषतः जुलै ते सप्टेंबर दरम्यान एक जीवघेणा संसर्ग झपाट्याने पसरतो आणि अनेकांच्या जीवाला धोका निर्माण करतो. हा संसर्ग म्हणजेच लेप्टोस्पायरोसिस एक जीवाणूजन्य आजार, जो प्रामुख्याने उंदरांसारख्या संक्रमित प्राण्यांच्या मूत्रामुळे दूषित झालेल्या पाण्यातून पसरतो.

पावसाळ्यात अशा पाण्यातून चालताना, विशेषतः पायाला लहानसुद्धा जखम असणाऱ्यांना या संसर्गाचा धोका जास्त असतो. तसेच विशेषतः जर ते चपला किंवा बूट न घालता चालत नसतील, तर त्यांनीही याचा धोका असतो. धारावीत अनेक वर्षे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स सांगतात की जुलै ते सप्टेंबर या काळात दर महिन्याला सरासरी २० ते ३० लेप्टोचे रुग्ण समोर येतात. सर्व वयोगटांतील लोकांना हा आजार होऊ शकतो; मात्र लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना त्याचा धोका अधिक असतो.

आकडेवारी काय सांगते?

  • महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ नुसार, लेप्टोस्पायरोसिसमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २२५% वाढ नोंदवण्यात आली आहे आणि मुंबई हे या साथीचे केंद्रबिंदू ठरले आहे.
  • २०२४ मध्ये राज्यात लेप्टोमुळे २६ मृत्यू झाले,
  • २०२३ मध्ये हे प्रमाण केवळ ८ होते.
  • एकट्या मुंबईत १८ मृत्यू ऑक्टोबर २०२४ पर्यंत नोंदवले गेले,
  • ९५३ रुग्णांची नोंद झाली, विशेषतः धारावी, कुर्ला आणि गोवंडी परिसरांमधून.
  • २०१८ मध्ये धारावीतील १७ वर्षीय मुलगा लेप्टोमुळे सायन रुग्णालयात मृत्यूमुखी पडला होता, ही घटना आजही लोकांच्या स्मरणात आहे.

हुसैनी मशीदजवळील धारावी पोलीस ठाण्याच्या मागील गल्लीत राहणाऱ्या अमिना बानू शेख सांगतात, “माझ्या झोपडीबाहेर गेली अनेक वर्षे गटार वाहतंय. तिथे उंदीरच उंदीर आहेत. माझी मुलं दिवसभर त्याच जागी खेळतात. त्यांच्याकडे शाळेसाठी फक्त एक जोडी बूट आहे; बाकी वेळ ते अनवाणीच राहतात. माझ्या ११ वर्षांच्या मुलीला गेल्या वर्षी लेप्टो झाला होता. यावर्षीही तसेच होईल, अशी मला भीती वाटते.”

धारावीतील ब्लॉक क्र. ५ चे रहिवासी अनिस उपहासात्मक सुरात म्हणतात, “धारावीची स्थिती अशी आहे की, इथल्या गल्लींत मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टो – काय हवं ते मिळेल! मुलं आजारी पडतात, त्यांना सायन रुग्णालयात नेलं जातं, आणि तिथेच त्यांचा अंत होतो.”

डॉ. अनिल पाचनेकर, जे १९८५ पासून धारावीत वैद्यकीय सेवा देत आहेत, म्हणतात, “धारावीत लेप्टोचा प्रश्न अधिक गंभीर आहे, कारण पाणी व ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचतं, नाले तुंबतात, आणि त्याच पाण्यात उंदीर, मांजरं आणि इतर प्राणी मूत्र विसर्जन करतात. त्या मूत्रात असलेल्या जीवाणूंमुळे जखमीतून संसर्ग होतो.” डॉ. पाचनेकर हे भारतीय वैद्यकीय संघटनेचे माजी अध्यक्ष देखील आहेत.

डॉ. अमजद बाग, जे ९० फूट रस्त्यावर दवाखाना चालवतात, म्हणतात – “धारावीत पावसाळ्यात होणाऱ्या आजारांची ही दु:खद कहाणी वर्षानुवर्षं तशीच सुरू आहे. इथली परिस्थिती अशी आहे की लोकांना आजारांपासून वाचणं शक्यच नाही. मुलं अस्वच्छ रस्त्यांवर खेळतात, लोकांना कामावर जाण्यासाठी पाण्यातूनच जावं लागतं. प्रत्येकाकडे चप्पल, बूट असतीलच असं नाही. इतक्या वर्षांत काहीही बदल झालेला नाही.”

धारावी मध्ये लेप्टोस्पायरोसिस ही केवळ वैद्यकीय नव्हे तर सामाजिक, नागरी आणि धोरणात्मक व्यवस्थेच्या अपयशाची भयावह झलक आहे. धारावीतील नागरिकांचे जीवन आणि आरोग्य हे धोका पत्करूनच चालले आहे. पावसाळा येतो तसा आजारांचाही कहर वाढतो आणि दुर्लक्षित गल्ल्यांतील ही लोकं पुन्हा एकदा भीती, वेदना आणि संकटात सापडतात.