अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून उघडपणे नाराजी व्यक्त, राजकारण सोडण्याचं वक्तव्य

"आम्ही आयुष्यभर त्यांना विरोध केलेला आहे. मग आम्ही राजकारण करण्यापेक्षा घरी बसू. राजकारण हे तत्वाकरता राहावं. आयाराम गयारामांचं राजकारण झालं तर राजकारणाला काही अर्थ उरणार नाही. तसं राजकारण मला करायचं नाही", असं म्हणत दिलीप मोहिते पाटील यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून उघडपणे नाराजी व्यक्त, राजकारण सोडण्याचं वक्तव्य
Chetan Patil | Updated on: Feb 28, 2024 | 5:22 PM

मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटीला यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील अजित पवार गटात सहभागी होतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. या चर्चवर बोलताना दिलीप मोहिते पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. “माझं त्यांच्याबद्दल वैयक्तिक मत आहे की, मी गेली 20 वर्षे त्यांच्यासोबत भांडतोय. त्यांनी ज्या खालच्या पातळीवर माझ्यावर आरोप केले ते मी आयुष्यभर विसरु शकत नाही. अशी वेळ आली तर मी घरी बसेल. या पलिकडे दुसरं मी काही करणार नाही”, असं दिलीप मोहिते पाटील म्हणाले.

‘मला पार जेलमध्ये बसवण्यापर्यंत, मला आयुष्यातून उठवण्यापर्यंत भूमिका घेणाऱ्यांसोबत…’

“नुसती चर्चा आहे. स्वागत करायचं की नाही हा जर-तरचा भाग आहे. आम्ही आयुष्यभर त्यांना विरोध केलेला आहे. मग आम्ही राजकारण करण्यापेक्षा घरी बसू. राजकारण हे तत्वाकरता राहावं. आयाराम गयारामांचं राजकारण झालं तर राजकारणाला काही अर्थ उरणार नाही. तसं राजकारण मला करायचं नाही. त्यामुळे पक्ष त्यांचं स्वागत करेल. त्याबाबत माझं दुमत नाही. शेवटी पक्ष आहे. पक्षाला जो निर्णय घ्यायचा तो घेईल. पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी काय करायचं हा मला अधिकार आहे. मला पार जेलमध्ये बसवण्यापर्यंत, मला आयुष्यातून उठवण्यापर्यंत भूमिका घेणाऱ्यांसोबत मी काम करायचं की नाही? हे ठरवण्याचा अधिकार मला आहे. करेन किंवा नाही करणार. मी त्यावेळेला ठरवेल. माझ्या लोकांना विचारेन”, अशी प्रतिक्रिया दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.

आढळराव पाटील काय म्हणाले?

दुसरीकडे शिवाजी आढळराव पाटील यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या नाराजीवर बोलणं टाळलं आहे. पण शिरुर लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असं आढळराव पाटील म्हणाले आहेत. “मी राष्ट्रवादीकडून की शिवसेनेकडून निवडणूक लढवणार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील”, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले आहेत. “खासदार अमोल कोल्हे स्वत: निर्यात केलेले उमेदवार आहेत”, असा टोला त्यांनी लगावलाय. तसेच “शिरुरमधून मीच लोकसभा निवडणूक लढवणार”, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले आहेत.

“असं काही मला वाटत नाही की अशी चर्चा झालीय. मला आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर कळेल. अशी परिस्थिती निर्माण झाली तर आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. मला वाटतं अजून 24 तासात निर्णय होईल. अमोल कोल्हे यांनी या विषयावर बोलूच नये. ते आधी मनसेत होते. मग शिवसेनेत, त्यानंतर राष्ट्रवादीत आले. मध्ये मध्ये भाजपला डोळा मारतात. अजित दादांकडे करमलं नाही. 24 तासात युटर्न घेतला. त्यांनी आयात-निर्यात या विषयावर चर्चाच करुन नये. त्यांना तो अजिबात अधिकार नाही”, अशी टीका आढळराव पाटील यांनी केली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us