मुंबई : मराठी भाषेला “अभिजात” दर्जा (Marathi language elite status) मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. या अनुषंगाने मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या मार्गदर्शनाखाली एक जनअभियान (Mass campaign) सुरु करण्यात आलेले आहे. “अभिजात” दर्जा मिळावा यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर एकटवले आहेत आणि या जनअभियानात सहभागी झालेले आहेत. अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेला आहे. मराठी भाषेला तात्काळ “अभिजात” दर्जा मिळण्याचा प्रश्न पूर्णत्वास नेण्यासाठी उद्या सोमवारी 21 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई हे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि जी. कृष्णा रेड्डी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान “आवश्यक असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील आपण दूरध्वनीवरून संपर्क साधणार आहोत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याासाठी आग्रहाची विनंती करणार आहोत, अशी माहिती यावेळी सुभाष देसाई यांनी दिली.
या भेटीवेळी सुभाष देसाई यांच्या सोबत प्रधान सचिव भूषण गगराणी, मराठी भाषा विभागाचे अधिकारी आणि लेखक दिगदर्शक श्रीरंग गोडबोले हे शिष्टमंडळ सुद्धा असणार आहे. सुभाष देसाई आणि शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना महाराष्ट्रातील नामवंत लेखक, विचारवंत व मराठी कलाकार अशा अनेक मान्यवरांची स्वाक्षरी असलेले विनंती पत्र सुपूर्द करणार आहेत, तसेच 27 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी भाषा दिवस आहे आणि त्याआधी मराठी भाषेला “अभिजात” दर्जा मिळावा यावर शिक्कामोर्तब व्हावे, हा आग्रह धरणार आहेत, अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना सुभाष देसाई म्हणाले की, आवश्यक असल्यास आम्ही उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना देखील दूरध्वनीवरून आग्रहाची विनंती करणार आहोत, तसेच दिल्लीमधील महाराष्ट्रातील नेतेमंडळी आणि अधिकारी यांची देखील मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या पार्श्वभूमीवर भेट घेणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून मराठी भाषेला अभिजात दर्ज देण्यात यावा अशी मागणी माराठी भाषिकांमधून होत असून, या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
गिरीश महाजन यांना राजकारणात मी जन्माला घातलं, मात्र बाप विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही-एकनाथ खडसे